Monday, November 15, 2010

शिरवळकर नावाचं गारूड


१५ नोव्हेंबर -- कै. सुहास शिरवळकरांचा जन्मदिन ! 

ह्या लेखाचे पूर्वप्रकाशन ’सुहास शिरवळकर – असे आणि तसे’ ह्या पुस्तकात झाले आहे पण ब्लॉगवर हा लेख प्रकाशित करण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस कुठला?

---------------------------------------------------------------------------
‘८५२, रविवार पेठ, पुणे’ हा पत्ता कधीच विसरणार नाही. तो सुहास शिरवळकरांच्या घराचा होता !

सुशिंची पुस्तकं वाचायला सुरूवात नक्की कुठल्या पुस्तकाने केली ते आठवत नाही, पण झपाटल्यासारखी सगळी वाचून काढली होती. एकदा / दोनदा  आणि काही पुस्तकं तर कित्येकदा ! साधारण नववीत वगैरे असेन जेव्हा मनावर ‘शिरवळकर’ नावाचं गारूड पडणं सुरू झालं होतं.

एकदा अशीच हुक्की आली की त्यांना पत्रं लिहावं.  तो पर्यंत पहिल्या फटक्यातच दहावी पास करून अकरावी सुरू झाली होती. त्यामुळे डोक्यावर दोन अदृश्य शिंगंही फुटली होती ! मग काय, मनात आलं ना , लिहिलं पत्रं आणि टाकलं बिनधास्त. मनात म्हटलं, “फारतर काय होईल? पत्राचं उत्तर येणार नाही, बास ! निदान ‘पत्र टाकायला हवं होतं’ ही रूखरूख तरी राहणार नाही. ”

पण एका दिवशी पोस्टमन पत्र  देऊन गेला. आपल्या नावाचं पत्र आलं ह्याचंच खूप अप्रूप असायचं तेव्हा ! मजकूर वाचण्याआधी नजर वेधून घेतली ती पत्राखालच्या लफ्फेदार सहीनं -  स्नेहांकित, सुहास शिरवळकर !
त्या पत्रातलं ’दुनियादारी मात्र जरूर वाच’ हे त्यांचं वाक्यं अजूनही आठवतंय.  ‘आनंद पोटात माझ्या माईना’ या ओळीचा अर्थ एका झटक्यात समजला.  

आपलं काय असतं ना, एक गोष्ट मिळाली की दुसरी मिळावी असं वाटायला लागतं ! आता वाटायला लागलं होतं की शिरवळकर प्रत्यक्ष भेटले तर काय धमाल होईल ना? पुन्हा एकदा पत्रापत्री झाली. त्यातही किडा म्हणजे साधारण १९७७ सालाच्या सुमारास त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातला काहीतरी प्रश्न विचारला होता.  शिरवळकरांनी सांगितलं एखादा रविवार गाठून साधरण चारच्या सुमारास ये.  

आम्ही चार मित्र चार वाजता म्हणजे चारच्या ठोक्याला त्यांच्या घरी हजर !  ‘रविवार दुपारची झोप’ हा काय मस्त प्रकार असतो आणि त्या झोपेतून कुणाला उठवणं म्हणजे काय पाप असतं हे कळायचं वय नव्हतं हो ते !  चार म्हणाले ना… मग आम्ही चारला हजर !  रविवारच्या झोपेतून उठायला लागूनही, चहाबरोबर आमच्याशी छान हसत, जोक्स वगैरे करत बोलणारे सुशि आवडले म्हणजे आवडलेच होते !

मग पुढे अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या  पण त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो ते कधीच विसरणार नाही. क्वचित कधीतरी अचानकही त्यांच्याकडे चक्कर व्हायची.  ते घरी असल्याची खूण म्हणजे घराबाहेर उभी असलेली त्यांची मोटरसायकल. ’बॉबी’ सिनेमातली ऋषी कपूरची मोटरसायकल आठवतीये?  सुशिंची बाईक सेम तशीच होती. अशा प्रकारच्या मोटरसायकलला, त्यांनी ’जाता-येता’ या पुस्तकात, ’बुटकं’ हे पर्फेक्ट नाव दिलंय !

अमेरिकेहून एकदा मी सुट्टीवर गेलो असताना झालेल्या धावत्या-पळत्या भेटीत तर त्यांनी ‘जाता-येता’ हे पुस्तक प्रेमाने भेट दिलं होतं ! तसंच कधी विसरणार नाही ते त्यांनी दिवाळीला पाठवलेलं ग्रिटींग कार्ड. एकतर मजकूर मराठीत होता आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वत: लिहिलेला होता !
‘मागे वळून पाहू नकोस, काजळरात्री सरल्या आहेत
सरल्या क्षणाशी रेघ मार, खिन्न दिवस लोपले आहेत….’
अशी त्या शुभेच्छांची सुरूवात होती आणि  शुभेच्छा पूर्ण करायला
‘मागे वळून पाहू नकोस, 
दिवाळीच्या स्वागताला
पाठमोरा होऊ नकोस !’  या ओळी होत्या !

शिरवळकरांच्या पुस्तकांत असं काय असायचं ज्यामुळे वाचक, विशेषत: तरूण वाचक, त्यांचे कट्टर फॅन व्हायचे? (खरंतर अजूनही होतात !)  मला स्वत:ला जाणवलं ते हे की शिरवळकरांची पात्रं तुमच्याशी बोलतायत असं वाटतं. त्यांच्या लेखनशैलीमुळे वाचकाला वाटतं आपणही या पुस्तकातलं एक पात्रं आहोत, या सगळ्या घटना जणू आपल्या आजूबाजूला घडतायत ! त्यांची भाषा ओघवती तर होतीच पण आपल्या बोलण्यातले नेहमीचे शब्द, विराम चिन्हे वगैरे या सगळ्यांसकट भाषा कागदावर यायची. ते जरी ‘लिहीत’ होते तरी वाचकाला असं वाटतं की कागदावरचा मजकूर आपल्याशी ‘बोलतोय.’  त्यामुळे बघा, त्यांच्या पुस्तकांत प्रसंगाप्रमाणे योग्य शब्दच वापरलेले दिसतील.

अगदी ढोबळ मानाने म्हणायचं तर त्यांनी दोन प्रकारचे लेखन केलं, राईट? म्हणजे बघा हं -– सामाजिक कादंबरी हा एक प्रकार आणि रहस्यकथा / थरारकथा हा दुसरा प्रकार.  फिरोज इराणी, बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन आणि दारा ’बुलंद’ ह्यांच्या करामतींचं लेखन दुसऱ्या प्रकारचं.  तर दुनियादारी, कल्पांत, क्षितीज, झूम वगैरे पहिल्या प्रकारचं लेखन. (अजून ’य’ नावं देता येतील पण तुम्हाला माहितीच आहेत की ती !)

लेखनाचा प्रकार कुठलाही असो, त्यांच्या पुस्तकांची नावं एक से एक आहेत. नुसतं ’दुनियादारी’ म्हटलं की खलास ! तसंच ’जाता-येता’, ’बरसात चांदण्याची’, ’थरारक’, ’तुकडा तुकडा चंद्र’, ’सॉरी सर’, ’ओ ! गॉड’, ’टेरिफिक’, ’गिधाड’, ‘एक… फक्त एकच’, ’तलखी’, ’म्हणून’, ’अखेर’, ’गुणगुण’, ‘थर्राट’, ’गढूळ’, ‘इथून तिथून’, ’समांतर’ ….. हॅ ! यादी पुन्हा वाढायला लागली.  एक मात्र नक्की, त्यांच्या पुस्तकाचं नाव ऐकूनच पुस्तक वाचावंस वाटायला लागतं. जसं हिंदी सिनेमा दिग्दर्शक एन. चंद्राच्या सुरूवातीच्या काळात सिनेमाच्या नावावरूनच तो पहावासा वाटायचा, म्हणजे ‘अंकुश’, ‘तेजाब’, ‘प्रतिघात’ वगैरे, तसंच !

शिरवळकरांच्या पात्रांची नावंही ’सही’ आहेत ! नायकाचे नाव आणि आडनाव एकाच अद्याक्षरावरून  किंवा नायक – नायिकेची पहिली नावं एकाच अद्याक्षरावरून हा विचित्र प्रकार त्यांनी केल्याचं आठवत नाहीये ! त्यांच्या काही पात्रांच्या नावांवरून नुसती नजर टाका -- फिरोज, अमर, मंदार, दारा, डॅनी, गोल्डी, बादल, मधुर, सलोनी, शिल्पा, रश्मी, मोहिनी, श्रेयस, दिग्या (डी.एस.पी), चंद्रवदन, गंधाली…. आणि कितीतरी अगणित नावं ! ही सगळी नावं त्या त्या पात्रासाठी चपखल आहेत… अगदी बॅ. दीक्षितही !

त्यांच्या लेखनशैलीतला मला भावलेला अजून एक भाग म्हणजे कथानकाचा वेग. कथानक उलगडताना, वातावरणनिर्मितीसाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी, ते पुस्तक कधी रेंगाळत ठेवायचे नाहीत. एकदा पुस्तक वाचायला घेतलं की ‘आता पुढे काय होणार आता’ ही उत्सुकता कायम ताणलेली राहते – मग भलेही ते पुस्तक म्हणजे एखादी सामाजिक कादंबरी असली तरी.  तसंच एखाद्या पात्राचं वेगळेपण नक्की किती एक्स्पोज करायचं आणि कुठे थांबायचं ते शिरवळकरांना चांगलं माहिती होतं. म्हणूनच तर फिरोज इराणी मोजक्या पुस्तकांत ‘बैदुल’ वापरतो किंवा बॅ. अमर विश्वास अगदी म्हणजे अगदीच मोजक्या पुस्तकांत ‘रातों का राजा’ म्हणूनही दिसतो ! एका वयात तर वाटायचं की राजस्थानला गेलो तर दारा ‘बुलंद’ भेटेलही कदाचित !!

त्यांच्या  पुस्तकांतल्या प्रस्तावना वाचणंही एक वेगळाच आनंद असतो.  प्रस्तावनेतून तर चक्क आपल्याशी one on one गप्पा करतायत असं वाटतं.  पण लोकांना आपल्या प्रस्तावना आवडतायत म्हणून त्यांनी स्वत:च्या भारंभार पुस्तकांना प्रस्तावना अजिबात लिहिल्या नाहीयेत. मगाशी म्हटलं ना की कुठे थांबायचं ते शिरवळकरांना नक्की माहिती होतं.

रसिक नजर आणि कलात्मक सौंदर्यदृष्टी ही त्यांची अजून एक खासियत. तुम्ही जर अट्टल सुशि फॅन असाल तर तुम्हाला मी काय म्हणतोय ते लगेच कळेल. एखादी हवेली, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा एखादं हिल स्टेशन मांडताना त्यांच्यातला रसिक भरात असायचा. ही तर झाली निर्जीव ठिकाणं मग मोहक नायिकेचं वर्णन किंवा डॅशिंग नायकाचं वर्णन वाचताना तर असं वाटतं की आत्ता या पात्राला भेटून/बघून यावं !

सुशिंची पुस्तकं वाचता-वाचता कित्येक वर्षं कशी गेली कळलंच नाही.  अमेरिकेला आल्यावर त्यांच्याशी अधून-मधून फोनवर बोलणं व्हायचं किंवा पुण्याला गेल्यावर एखादी धावती भेट.  एक दिवस दै. लोकसत्ताच्या वेबसाईटवरच्या बातमीतून समजलं -- सुशि गेले!! दोन हजार तीनच्या जुलै महिन्यात – अचानक, ध्यानीमनी नसताना ! आमचे अजितकाका म्हणाले होते तसं, “माणसाचं आयुष्य कधी आणि कसं संपेल ते सांगता येत नाही’ हेच खरं !  अजितकाका म्हणजे सुप्रसिद्ध बासरीवादक आणि अत्यंत सज्जन माणूस -- कै. अजित सोमण. या लेखाच्या निमित्ताने, पुन्हा एकदा, मनात अजितकाकांच्याही आठवणी आल्या.

शिरवळकरांची आठवण येत असतेच पण दीडएक वर्षापूर्वी मी मराठी ब्लॉग लिहायला सुरूवात केली तेव्हा सुशिंची खूपच आठवण आली होती.  त्यांना माझे लेखनाचे प्रयत्न दाखवायला आवडलं असतं आणि माझी खात्री आहे, त्यांनीही खूप प्रोत्साहन दिलं असतं.  सुशि जरी आता आपल्यात नसले तरी एक मात्र नक्की – त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी इतकं भरभरून लिहून ठेवलंय की ते वाचकांच्या अनेक पिढ्यांना पुरेल !

(कै. अजितकाकांबद्दलच्या सुरेल आठवणी ह्या ब्लॉगवर इथे आहेतच.)

Saturday, September 11, 2010

एका तेलियाने

’शेख अहमद झाकी यामानी !’
नाव ऐकलंय? किंवा ऐकल्यासारखं वाटतंय ?

’एका तेलियाने’ हे पुस्तक वाचण्याआधी ’शेख अहमद झाकी यामानी’ या नावाशी कधी थेट संबंध आला नव्हता. सौदी अरेबिया, तिथली राजेशाही, तेलामुळे मिळणारा आणि ऐषोआरामासाठी पाण्यासारखा वाहणारा त्यांच्याकडचा पैसा ह्याबद्दल इथून-तिथून किस्से / कहाण्या ऐकल्या / वाचल्या होत्या. लंडनच्या नाइटक्लब्जमधे एकेका रात्रीत लाखो डॉलर्स उधळणाऱ्या राजपुत्रांबद्दलही वाचलं होतं.  (हो लाखो डॉ-ल-र्स उधळणारे !) पण ह्या सगळ्या चैनबाजीत कुठेही ’यामानी’ हे नाव ऐकल्याचे आठवत नव्हते. किंबहुना ते तसे ऐकले नव्हतेच ! मुळात यामानींना ’शेख’ जरी संबोधलं जातं तरी ते सौदी राजघराण्यातील नाहीयेत. (अगदी सौदी राजघराण्यातल्याही मोजक्या लोकांनाच ’शेख’ म्हणवून घेता येतं.) म्हणजेच सौदी राजघराण्याच्या परंपरेनुसार ते ’शेख’ नाहीयेत. मग या माणसात असं काय आहे म्हणून तो असा एकमेव माणूस असावा जो सौदी राजघराण्यातला नसूनही ’शेख’ म्हणवला जातो? या माणसात असं काय आहे म्हणून त्याच्यावर मराठीमधे स्वतंत्र (अनुवादित नाही !) पुस्तक निघावं ?

ह्या उत्सुकतेनेच श्री. गिरीश कुबेर ह्यांचं ’एका तेलियाने’ वाचायला घेतलं. पुस्तकाच्या पाठीमागे आणि पहिल्या प्रकरणाच्या सुरूवातीस यामानींबद्दल लिहिलेली संक्षिप्त माहिती पाहून तर उत्सुकता अजूनच ताणली गेली. नमुना म्हणून ह्या ओळी पहा –
>> हा आजारी पडला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला तर अनेक देशांत दिवाळी साजरी व्ह्यायची.
>> आत्ताआत्तापर्यत याचं नाव बातम्यांत नाही असा दिवस जात नव्हता.
>> एखाद्या सम्राटासारखा राहायचा. स्वत:च्या विमानातनं फिरायचा. ऐश्वर्यसंपन्न, तरीही निरासक्त.
>> कधीच कंटाळायचा नाही हा युक्तिवाद करायला. जे याला अमान्य आहे, ते पटवणं कठीण.
>> पण आता आपण या गावचेच नाही, असं आयुष्य तो जगतोय.

तर, असे हे यामानी हे १९६२ ते १९८६ इतकी वर्षे सौदी अरेबियाचे तेलमंत्री होते ! 
ह्या एका वाक्यात यामानींचे महत्व समजतं. असं म्हणतात की ’भगवान देता है तो छप्पर फाड के देता है !” देवाने सौदी अरेबियाला रखरखीत वाळवंट दिलं पण त्या वाळवंटाच्या पोटात एक प्रचंsssड मोठ्ठी जणू टांकसाळ ठेवली आणि ती म्हणजे -- तेल ! काळं सोनं !! Black Gold !!!
जगात जितके तेलसाठे आहेत त्यापैकी सर्वात मोठा साठा’सौदी अरेबिया’कडे आहे !

’तीळा तीळा दार उघड’ झाल्यावर त्या खजिन्यावर नियंत्रण ठेवणारा माणूस म्हणजे यामानी ! सौदी अरेबियाचे राजे फैझल ह्यांचा उजवा हात म्हणजे यामानी ! यामानींच्या सुदैवाने राजे फैझल हे सौदी अरेबियात(ही) स्त्रियांनी शिकावं अशी आकांक्षा धरणारे सुधारणावादी होते ! असं म्हणलं जातं की मध्यपूर्व आशियामधे जे वाद पराकोटीचे चिघळले आहेत ते तसे झालेत कारण राजे फैझल जगात नाहीयेत आणि यामानी आता तेलमंत्री नाहीयेत  ! काही माथेफिरूंसाठी यामानी इतका मोठा अडसर होते की कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी कार्लोस (’द जॅकल’) ह्याने जेव्हा वेगवेगळ्या देशांच्या तेलमंत्र्यांचे ’ओपेक’च्या कार्यालयातून अपहरण केले होते तेव्हा यामानींना ठार करावे अशी त्याला स्पष्ट सूचना दिली गेली होती!

सौदी अरेबियाचे अतिशय कार्यक्षम तेलमंत्री असणं हे जितकं महत्वाचे तितकंच मोठं यामानींचं अजून एक कार्य म्हणजे ते ’ओपेक’ आणि ’ओआपेक’ ह्या संघटनांचे पस्तीस वर्षांहून अधिक काळ सूत्रधार होते. तेल उत्पादन करणारे देश (’ओपेक’) आणि तेल उत्पादन करणारे अरेबियन देश (’ओआपेक’) ह्या दोन संस्थांसाठी यामानींनी भरपूर काम केलंय. अमेरिका, इंग्लंड, व्हेनेझुएलापासून ते पार रशिया, भारत, चीन, अरब राष्ट्रे ह्या सगळ्यांना यामानींचं महत्व पक्कं माहिती होतं.

’एका तेलियाने’ वाचताना एका नजीकच्या इतिहासाची इतकी मस्त सफर घडते सांगतो.  आपण एखादी छान रहस्यमय कादंबरी वाचतोय असं वाटतं. मला तर वाटलं की शाळेतली इतिहासाची पुस्तकं अशी लिहिली गेली असती तर मुलांनी सनावळ्या आणि तहाची कलमं पाठ करण्यात बालपण खर्ची घातलं नसतं ! ’इतिहास’ हा रंजक विषय झाला असता !

श्री. गिरीश कुबेर ह्यांनी तपशील आणि कहाणी ह्याची योग्य सांगड घालून एक मस्त पुस्तक लिहिलं आहे. पत्रकारितेच्या व्यवसायातले गिरीश कुबेर ह्यांनी ’एका तेलियाने’ लिहायच्या आधी ’तेल’ ह्या विषयाबद्दल अजून एक पुस्तक लिहिले आहे. ’एका तेलियाने’ मला इतकं आवडलं की आता ते पहिलं पुस्तक वाचायची उत्सुकता आहे.  ते पुस्तक  म्हणजे ’हा तेल नावाचा इतिहास आहे’ !

Sunday, May 2, 2010

चित्रकलेचा दोर

चित्रकलेचा दोर मी कधीच कापून टाकला आहे’ – कै. पु..देशपांडे.

मिळवलेले ज्ञान कधी वाया जात नाही’ – एक सुविचार !

ही दोन वाक्यं एकत्र लिहिण्याचं कारण म्हणजे आमचे चिरंजीव ! वय वर्षं जेमतेम पाच, त्यामुळे बालहट्टापुढे कधी कधी शरणागती पत्करावी लागते.

(“ ! कोण आहे रे तिकडे? स्त्रीहट्टापुढेही शरणागती पत्करावी लागते असं हळूच कोण म्हणतोय?”)

तर, झालं असं की आदित्यने अगदी लाडात येऊन, चेहऱ्यावर लहान मुलांचे टिपीकल निरागस टाइप्स वगैरे भाव आणत विचारलं, “बाबा, मला तू शिवाजीचं हे चित्रं काढून देशील का?” आता मला काय माहिती की त्याने आधी त्याच्या आईलाही हाच प्रश्न विचारलाय आणि तिने,”बाबाला सांगम्हणून परस्पर मला लटकवलंय ते ! आदित्यने जे चित्रं दाखवलं होतं ते एका सीडीच्या कव्हरचं होतं आणि शिवाजी महाराजांचा चेहरा निदान काढणेबल वाटत होता.

आता खरंतर मी चित्रकलेची एलिमेंटरी परीक्षा अडखळलेला माणूस ! पण त्याचं मन मोडायला नको म्हणूनहोम्हणालो. आदित्यला माहिती नव्हतं की त्याने नक्की कोणालाचित्र काढतोस का?” म्हणून विचारलं आहे आणि मला माहिती नव्हतं की आपण नक्की कशात पाय टाकतोय !

तरी थोडावेळ जरा टाळाटाळ करून पाहिली पण अशावेळी लहान मुलांची चिकाटी दसपटीने वाढते ! शेवटी एकदाचं आम्हाला शाळेत चित्रकला शिकवणाऱ्या खाडिलकरबाईंचं नाव घेतलं आणि कागदावर पेन्सिल टेकवली. व्होह ! शाळा सुटल्यानंतर इतक्या वर्षांनी पहिल्यांदा चित्र काढायला घेतलं होतं.

मगाशी म्हणाल्याप्रमाणे मी आधीच चित्रकलेचा औरंगजेब आणि त्यात चेहरे-बिहरे काढण्यात शाहिस्तेखान ! त्यातल्यात्यात तेस्टिल लाईफनावाचं प्रकरण, म्हणजे भांडी-कुंडी, घमेली, त्यात ठेवलेली फळं, असं काहीतरी काढायला जमायचंअगदी त्यावर पडणाऱ्या प्रकाशानी येणारी थोडी चकाकी दाखवणं आणिभांडी खोलगट आहेतहे दाखवणंही जमायचं पण ते मेमरी ड्रॉईंग आलं की आधी डोकं आणि मग हात चालणं बंद व्हायचं। एकवेळ कसातरी माणूस काढता यायचा पण त्याचे हात आणि पाय ? ते कसे काढायचे? पाय तर कायम चार्ली चॅप्लिनच्या पोझमधे असायचे ! हे कमी होतं म्हणून की काय पण त्या चित्रकलेच्या परीक्षेतगावातली जत्राकिंवाशहरातली बाग आणि खेळणारी मुलंवगैरे असले वस्त्रहरण करणारे विषय यायचे ! इथे च्यायला एक माणूस काढताना फेफे उडतेय आणि तुम्ही जत्रा कसली काढायला सांगताय !

हं तर, आदित्यचा शिवाजी ! त्याच्याबद्दल सांगत होतो नाही का?

त्या सीडीवरच्या चित्राकडे बघत शिवाजी काढायला सुरूवात केली. बरेचदा आपलं काय होतं की कुठल्याही गोष्टीची सुरूवात सापडत नाही. एकदा वाटायचं महारांजांच्या मंदिलापासून चित्र काढायला सुरू करावं, मग वाटायचंत्यापेक्षा दाढीपासून सुरूवात करू’ ! मग शेवटी हो-ना करत करता, महाराजांच्या दाढीसारखंच त्यांचं दुसरं एक लक्षणीय फीचर आठवलं ते म्हणजे त्यांचं नाक. तर मग नाकापासून सुरूवात केली. त्यातल्या त्यात एक बरं होतं की शिवाजी महाराजांचा चेहरा साईड प्रोफाईल असल्याने नाक पूर्ण काढायचं नव्हतं, मराठीतलाहा आकडा उलटा काढून चालणार होतं!

मग एकदा नाक हा रेफरन्स पॉइंट मिळाल्यावर त्या अंदाजाने बाकीचा चेहरा कागदावर उमटायला लागला. सीडीवरचं चित्रं बघत बघत काढायचं होतं त्यामुळेआठवणीतले शिवाजी महाराजकाढायचा त्रास नव्हता ! असं करत करत एकदाचा महाराजांचा चेहरा पूर्ण झाला, अगदी डोक्यावरचा मंदिल आणि त्याच्या झिरमिळ्यांसहीत ! हुश्श !! एकंदर चित्रं कसं जमलं होतं त्यापेक्षा आदित्यला झालेला आनंदच बघण्यासारखा होता ! तो लगेच ते चित्रं हातात घेऊन, आनंदाने अगदीय्ये ! मम्मा चित्रं बघ हेवगैरे करत दीपाकडे गेला. ही लहान मुलं किती छोट्या छोट्या गोष्टींनी खूष होतात ना !

पणमला माहिती नव्हतं की आपण नक्की कशात पाय टाकतोयअसं मगाशी म्हणालो ते उगीच नाही !

चिरंजीव दुसऱ्या दिवशी अजून एका सीडीचं कव्हर घेऊन आले.
आताअफझल खान वधहे चित्र काढून हवं होतं !!

मग काय ! पुन्हा एकदा कागद, पेन्सिल, खोडरबर (अमेरिकन भाषेप्रमाणेइरेजरम्हणायचं....’रबरम्हणायची सोय नाही !) सगळं गोळा केलं. पुन्हा एकदा खाडिलकरबाईंचा धावा केला आणि अफझलखानाचा वध करायला घेतला ! तुम्ही आजकाल कुठलीही नोकरीसाठीची जाहिरात बघा, ’अटेन्शन टू डिटेल्सही ओळ नक्की सापडेल. आमच्या चित्राच्या बाबतीत आदित्यचीअटेन्शन टू डिटेल्सही नजर एकदम तेज असते. ’अरे बाबा ! तू शिवाजीच्या गळ्यातली माळ मोठी काढलीसकिंवाखांद्यावरचं डिझाईन नाही काढलंसवगैरे अशा सगळ्या भानगडींसकट त्याला चित्रं काढून हवं असतं !

पहिल्या चित्रात शिवाजी महाराजांचं नाक हा रेफरन्स पॉईंट मिळाल्यापासून आमचं प्रत्येक चित्रं नाकापासूनच सुरू होतं ! अफझल खान वधाचं चित्रं काढून होतं ना होतंय तर आदित्य म्हणाला तेबाजूला जे लिहिलंय ते तूही लिही हां” ! मग तिथेच बाजूला एक षटकोन काढून त्यातपराक्रामी सुर्याचा जन्महे शब्दही लिहून देणं आलं !

त्या दिवसापासून आजकाल जवळपास रोजच खाडिलकरबाईंचा धावा करतोय ! कारण जवळपास रोज एक शिवाजी काढावा लागतोय ! आधी नुसता शिवाजीचा चेहरा, दुसऱ्या दिवशी अफझल खान वध, तिसऱ्या दिवशी सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज, चौथ्या दिवशी पुण्यातला कोथरूडचा शिवाजी पुतळाम्हणजे अश्वारूढ महाराज, हातातल्या तलवारीसकट ! त्यामुळे आता सीडीच्या कव्हरवरून सीमोल्लंघन करून आम्ही गुगल इमेजेसपर्यंत पोचलो आहोत. आपलं लॅपटॉपवर त्याला गुगल इमेजेसमधले शिवाजी दाखवायचे आणि मग जणू बाळराजे फर्मान सोडतात, “आज ये चित्र बनाओ !” चित्रांचा अवघडपणा वाढतच चाललाय ! कालच संध्याकाळी तानाजी मालुसरे आणि उदेभान राठोड हे दोघं एकमेकांशी लढतानाचं चित्र काढलंय ! (आदित्य उदेभानचा उच्चारउभेभानअसा करतोय !) चित्रांच्या अवघडपणाचा आलेख वरच्या दिशेने जातच राहिला तर एक ना एक दिवस पावनखिंड किंवा पुरंदरची लढाई नक्की काढायला लागणार आहे ! मग आहेच मजाचार्ली चॅप्लिनचे पाय लावून सगळे मावळे आणि मुघल लढाई करत असतील !

तर साहिबान, कदरदान ! पेश--खिदमत आहेत्या दिवशी पहिल्यांदा काढलेला शिवाजी महाराजांचा चेहरा आणि मग केलेला अफझल खानाचा वध ! खरंतर मी(ही) चित्रकलेचा दोर कधीच कापला होता पण सध्यातरी बालहट्टापुढे त्या दोराला गाठी मारून घेतल्या आहेत !