Monday, September 15, 2008

आवडत्या कवितांचा खो

संवेदनी सुरू केलेल्या आवडत्या कवितांचा खो माझ्याकडे पूनमकडून आला. (http://www.kathapournima.blogspot.com/) धन्स पूनम… त्यानिमित्ताने आवडत्या कविता पुन्हा वाचणं / आठवणं झालं !

आपल्याला आवडलेल्या दोन कविता द्यायच्या नाही का? (हे तर अवघड आहे ! दोनच काय द्यायच्या?) दुसरा नियम असा की कविता पूर्ण असेल तरी चालेल, अर्धवट आठवत असेल तरी चालेल॥ पण स्वत:ची नसावी !

कलेजे पे पत्थर रख कर वगैरे दोनच कविता देतोय. खरंतर खूप खूप देता येतील पण ह्या दोन कविता एकमेकींपासून अगदी वेगळ्या आहेत.

पहिली कविता कुसुमाग्रजांची !
‘कोलंबसाचे गर्वगीत’ कवितेमधे --
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!”

आणि ’दूर मनोऱ्यात’ कवितेमधे –
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी
उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो~यात
अन् लावा हृदयात सखयांनो आशेची वात

असलं बेफाट लिहिणारे कुसुमाग्रज ’स्वप्नाची समाप्ती’ ह्या कवितेत लेखणी किती प्रणयमधुर करतात बघा !

स्वप्नाची समाप्ती
स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा

स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशात
खिरे रात्र कणकण
प्रकाशाच्या सागरात

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

रातपाखरांचा आर्त
नाद नच कानी पडे
संपवुनी भावगीत
झोपलेले रातकिडे

पहाटेचे गार वारे
चोरट्याने जगावर
येती, पाय वाजतात
वाळलेल्या पानांवर

शांती आणि विषण्ण्ता
दाटलेली दिशांतून
गजबज जगवील
जग घटकेने दोन!

जमू लागलेले दव
गवताच्या पातीवर
भासते भू तारकांच्या
आसवांनी ओलसर

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

प्राजक्ताच्या पावलाशी
पडे दूर पुष्परास
वाऱ्यावर वाहती हे
त्याचे दाटलेले श्वास

ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजतो या
आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!

खळ्यामध्ये बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यातील घुंगुरांचा
नाद कानी येऊ लागे

आकृतींना दूरच्या त्या
येऊ लागे रूपरंग
हालचाल कुजबूज
होऊ लागे जागोजाग

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

होते म्हणू स्वप्न एक
एक रात्र पाहिलेले
होते म्हणू वेड एक
एक रात्र राहिलेले

प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर

ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडात दिसू वेडे
आणि ठरू अपराधी
- कुसुमाग्रज (’विशाखा’)

ह्या कवितेमधील सगळ्यात जास्त वेड लावणाऱ्या ओळी म्हणजे --
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
सगळी कविता म्हणजे कॅनव्हासवर एखादं रोमँटिक चित्र उतरल्यासारखी आहे ना ?
-----------------------------------------------------
त्यानंतर आमच्या पिढीतला (म्हणजे तरूण वगैरे !!) संदीप खरे !
मी स्वत: आस्तिक असूनही त्याच्या ह्या कवितेने नक्कीच विचार करायला लावलं !

नास्तिक
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा खरंतर गाभाऱ्यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरत्या सत्याशी का होईना
पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याची….

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा शक्यता होते निर्माण की
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची….

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या नजरा
कोणीतरी स्वतःचेच ओझे स्वतःच्याच पायावर
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच….

म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित,
पण मिळते अखंड समाधान, एक सहकारी लाभल्याचे!!....

देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून....
तुमचा विश्वास नसेल आमच्यावर;
पण आमचा आहे ना!!!!!....

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात
तेंव्हा कुठे अनंत वर्षे घेऊ शकतो आपण दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे......
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो........
- संदीप खरे
----------------------------------------------
अजून खूप कवी आणि त्यांच्या कविता आहेत।

’घट्ट मिठी मारल्याशिवाय माणूस नसतं आपलं
ओठांवर आल्याशिवाय गाणं नसतं आपलं’
हे लिहिणारे मंगेश पाडगावकर आहेत.

तेवढ्यात हे लिहिणारे ना. धों. महानोर आठवतात.
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

किंवा मग –
’समुद्र बिलो्री ऐना
सृष्टीला पाचवा म्हैना’
असं गाणारे आनंदयात्री बा. भ. बोरकर आहेत.

पण काव्यमय खो-खोच्या नियमाप्रमाणे थांबायला हवं ! आता खो द्यायची वेळ.
माझा पहिला खो प्राजुला (http://www.praaju.blogspot.com/)
आता दुसरा खो तेजूला (http://halakafulaka.blogspot.com/)
(विचार केला आपण निदान प्राजु – तेजू असं तरी यमक जुळवावं !)
--------------