Saturday, November 12, 2011

जरासे जरासे


गुपित राहिले ना इशारे जरासे
कशाला हवे मग अडोसे जरासे?....

तयांच्या तशा त्याच गप्पांमधूनी
मनाने कसे ह्या रिझावे जरासे?

मला भेटताना लपूनी-छपूनी
तुझे नेहमीचे बहाणे जरासे.... ३

असा स्पर्श व्हावा तुझा वाटते की
तुलाही मिळावे दिलासे जरासे.... ४

असो पावसाळे वयाचे कितीही
धनुष्यात रंगच दिसावे जरासे.... ५

'इथे' सर्व काही मिळाले तरीही
मिळावे 'तिथे'ही जरासे जरासे.... ६
------------------------------------------------------
वृत्त  -- भुजंगप्रयात
लगावली -- लगागा  लगागा लगागा  लगागा
------------------------------------------------------
 

Sunday, April 24, 2011

तेंडल्या!


हा लेख म्हणजे सचिनबद्दलच्या काही चांगल्या लेखांची, विडियो क्लिप्सची एक साठवणही असावा अशी प्रामाणिक इच्छा होती.  हा लेख वाचायला घेताना जरा निवांत बसावं. भेळ, पकोडे वगैरे काहीतरी चटपटीत खायला घ्यावं, आणि त्याबरोबर मस्तपैकी गरम-गरम चहाचे घुटके घेत ह्या लेखाची आणि ह्या लेखात दिलेल्या ध्वनि-चित्रफितींची लज्जत घ्यावी !
------------------------------------------------------------------------------


तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है?” – वसिम अक्रम

त्याने गेली एकवीस वर्षे आपल्या सगळ्यांच्या अपेक्षांचे ओझे स्वत:च्या खांद्यांवर पेलले आहे. त्यामुळे आता आम्ही त्याला उचलून घेणंच योग्य होतं.” – विराट कोहली 


मी देव पाहिलाय! तो भारतासाठी कसोटी सामन्यांमधे चौथ्या क्रमांकावर खेळतो!” – मॅथ्यू हेडन

त्याच्यासारख्या खेळाडूला कापसात गुंडाळून जपलं पाहिजे.” – सर विव्ह रिचर्डस

हा माणूस २४१ धावा ठोकल्यानंतरही भपका न दाखवता उलट ड्रेसिंगरूममधे आल्यावर आपण कसे बाद झालो हे पुन्हा पुन्हा बघतो, म्हणजे पुढच्या वेळी ती चूक नको व्हायला.” – रवी शास्त्री

अग ऐकलंस का! हा बॅट्समन बघ. ह्याची बॅटींग बरीचशी माझ्या बॅटींगसारखीच आहे.”   -- सर डॉन ब्रॅडमन

वेगवेगळ्या काळात क्रिकेट खेळलेले आणि वेगवेगळ्या क्षमता असणारे हे सगळेजण. पण प्रत्येकाचं त्याच्याबद्दल एकमत आहे.  ’सचिन रमेश तेंडुलकर’ – सिर्फ नाम ही काफी है!

आपल्याकडे मूल चार-पाच वर्षांचं झालं की त्याला क्रिकेटचं वारं लागतंच आणि गेली एकवीस वर्षें सचिन  झपाटल्यासारखा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय.  त्यामुळे भारतामधले साधारणपणे वयाची पंचविशी पार केलेले सगळेजण अक्षरश: नशीबवान आहोत कारण आपल्या आपण आपल्यासमोर सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द बहरताना पाहिलीय. सचिनबद्दल लेख लिहायचा(च) असं ठरवत होतो पण योग्य वेळच कळत नव्हती. ज्या माणसाबद्दल सतत काही ना काहीतरी वाचनीय लिहिलं जातं त्याच्याबद्दल अजून वेगळं काय लिहिणार ! आणि लिहायचं तरी नक्की कशाकशाबद्दल
वर्ल्डकप जिंकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या निरागस आनंदाबद्दल?..

त्याच्या देशप्रेमाबद्दल?.. धावांच्या भुकेबद्दल?.. रनिंग बिटवीन दि विकेट्सबद्दल? ..

डोंगरापार गेलेल्या आकड्यांबद्दल? ..  विक्रमांनंतरच्या विक्रमांबद्दल? ..

त्याच्या सामाजिक जाणिवेबद्दल?..

बघणाऱ्याच्या मनात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या देखण्या ड्राइव्हजबद्दल? ..

फक्त सोळा वर्षांचा असताना त्याने वकार युनिस इम्रान खान वसिम अक्रम ह्या तोफखान्यासमोर केलेल्या कसोटी पदार्पणाबद्दल?..

शिरीष कणेकर म्हणाले होते तसं ज्या वयात आई-वडील मुलाला (एकट्याला) मॅच बघायलाही जाऊ देणार नाहीत”, त्या वयात त्याने अब्दुल कादिरसारख्या दिग्गजाला मारलेल्या षटकारांबद्दल?..

तो नॉन स्ट्रायकर एन्डला जरी उभा असला तरी तो आहेह्यामुळेच आपल्या मनात येणाऱ्या आश्वस्त भावनेबद्दल? ..

फलंदाजाला  गंडवणाऱ्या त्याच्या गोलंदाजीबद्दल? ..

सदतीसाव्या वर्षीही विशीतल्या झपाटलेपणाने फिल्डींग करण्याबद्दल? ..

बाई-बाटलीची कुठलीही भानगड न करता इतकी वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे उच्च स्थानावर राहण्याबद्दल? ..

न्यूझीलंडमधे १९९४ साली, होळीच्या दिवशी खेळताना, वन-डे सामन्यात पहिल्यांदाच सलामीला येऊन त्याने होळी खेळल्यासारख्या ४९ चेंडूंत ठोकलेल्या ८२ धांवाबद्दल?..

त्यानंतर आधी काही वर्षे गांगुलीबरोबर आणि मग वीरूबरोबर सलामीच्या जोडीत येऊन आपल्या सगळ्यांना त्याने जो आनंद वाटलाय त्या आनंदाबद्दल?...

कसोटी, एक दिवसाचा, ट्वेंटी-ट्वेंटी (आय.पी. एल) --- कुठल्याही प्रकारच्या सामन्यात त्याने ठोकलेल्या शतकांबद्दल?...

सचिन सेन्च्युरी मारतो पण आपण सामना हरतो त्याचं काय !”  असे तारे तोडणं म्हणजे फुकाची बडबड ठरते त्याबद्दल? …त्याच्या संघभावनेबद्दल? …

की सगळ्यात महत्वाचं म्हणजे -- तुमच्या वयाच्या प्रमाणात तो तुम्हाला तुमच्याच एखाद्या मित्रासारखा / धाकट्या भावासारखा / मोठ्या भावासारखा / मुलासारखा / नातवासारखा वाटतो त्याबद्दल? ..

एक दिवसाच्या सामन्यांमधले पहिले द्विशतक झळकवण्याचा मान सचिनने मिळवला तेव्हाच खरंतर हा लेख लिहायला पाहिजे होता पण सचिनप्रमाणेच मीही वाट बघत होतो त्याचं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होण्याची! आता ते स्वप्नं पूर्ण झालंय आणि २४ एप्रिल २०११ हा त्याचा अडतीसावा वाढदिवस! त्यामुळे हा लेख अजून थांबणं शक्यच नव्हतं.

ह्या लेखाच्या सुरूवातीला दिलेल्या उद्गारांपैकी तीन वाक्यं मला खूप महत्वाची वाटतात. 
ब्रॅडमन, अक्रम आणि कोहलीची वाक्यं!

डॉन ब्रॅडमन हे नाव धारण केलेला फलंदाजीतला अंतिम शब्दजेव्हा म्हणतो की सचिनच्या बॅटिंगमधे त्याला  स्वत:च्या खेळाची प्रतिमा दिसते तेव्हा आपल्यासारख्या सामान्य लोकांना बोलायला काही उरतं का

कुठल्याही खेळामधे प्रतिस्पर्ध्याने दिलेली दाद ही सगळ्यात मोठी दाद मानण्यात येते. २००३ सालच्या वर्ल्ड कपमधे भारत-पाक सामन्यात सचिनला बाद करण्यासाठी वयाची पस्तिशी पार केलेला वसिम अक्रम जीवाचं रान करत होता. शोएब अख्तर, वकार युनिस आणि वसिम अक्रमच्या धारदार आक्रमणावर सचिन सेहवाग ह्या दुकलीने चढवलेला प्रतिहल्ला तर नुसता टीव्हीवर बघतानाही आपल्या हाताच्या तळव्यांना घाम आला होता! आणि त्या धामधुमीत…..अक्रमच्या बॉलिंगवर अब्दुल रझ्झाकने सचिनचा कॅच सोडला!  अक्रमच्या डोकं वापरूनबॉलिंग करण्याच्या पद्धतीने मी नेहमी वेडा झालोय. (असे मला आवडणारे अजून काही तेज गोलंदाज म्हणजे कपिल देव, मायकल होल्डिंग, डेनिस लिलीइम्रान खान, कर्टनी वॉल्श, ग्लेन मॅकग्रा आणि रिचर्ड हॅडली. खरंतर ह्यातल्या प्रत्येकावर किमान एक लेख लिहिता येईल!) अक्रमचे ते खत्तरनाक स्विंग, रिव्हर्स स्विंग, आणि यॉर्कर्स! उगाच नाही त्याला सुलतान ऑफ स्विंगम्हणत! तर असा हा अक्रमत्याने पद्धतशीरपणे सचिनसाठी सापळा लावला होता पण…. ऐनवेळी रझ्झाकने स्वत:चं डोकं चालवलं आणि अक्रमने सांगिततेली जागा सोडून थोडा आतल्या बाजूला फिल्डिंगसाठी उभा राहिला. सचिनचा सुस्साट पण हवेतून जाणारा फटका रझ्झाकच्या हातून सुटला आणि…. गल्ली क्रिकेट खेळत असल्यासारखा खवळून अक्रम रझ्झाकवर ओरडला, तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है?”  मला वाटतं अक्रमसारख्या कसलेल्या प्रतिस्पर्ध्याने सचिनला नकळत दिलेली दाद नक्की समजण्यासाठी त्या वाक्यातला किसका हा शब्द पुरेसा बोलका आहे! (हे वाक्य इथे लिहिताना-वाचतानाही आपल्या अंगावर मूठभर मांस चढतंय च्यायला, तर त्या मॅचमधे स्वत:बद्दल हे वाक्य ऐकताना सचिनला नक्की काय वाटलं असेल?) त्या मॅचमधल्या सचिनच्या भन्नाट बॅटिंगची ही बघा झलक

ह्या वर्षीच्या वर्ल्डकपमधला भारत पाक सामना बघताना तर वाटत होतं जणू पाकिस्तानचे खेळाडू त्यांच्या कृतीतून दाखवून देतायत की सचिनने अजून खेळत राहवं, कॅच-बिच आले तर आम्ही सोडूच! पाकिस्तानी लेखक उस्मान समिउद्दीनने ह्या लेखात लिहिल्याप्रमाणे सचिनचे ४ झेल सोडल्यावर सामना जिंकण्याची अपेक्षा करणंच चूक ठरतं!

२५ जून १९८३ आणि २ एप्रिल २०११! जगभरातले भारतीय क्रिकेटप्रेमी ह्या तारखा कधीच विसरणार नाहीत. आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा विराट कोहली जन्मलाही नव्हता आणि दुसऱ्यांदा जिंकला तेव्हा तो जेमतेम तेवीस वर्षांचा होता.  म्हणजे तो एक-दोन वर्षांचा असताना सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू झाली! वर्ल्ड कप जिंकल्यावर कोहली सचिनबद्दल जे म्हणाला ते वाक्यं त्याचं होतं पण त्यातली भावना मात्र तुमच्या-माझ्यासारख्या असंख्य भारतीयांची होती. ह्यापुढे विराट कोहलीचं क्रिकेटमधलं करीयर कसंही असलं (आणि ते भरभराटीचं असावं  ह्या मनापासून शुभेच्छा) तरी त्या एका वाक्यामुळे जागतिक क्रिकेटच्या इतिहासात कोहलीचं नाव आत्ताच अजरामर झालंय ह्याबद्दल दुमत नसावं! विराट कोहलीला ते वाक्य म्हणताना पुन्हा एकदा बघायचंय?

विराट कोहली तर कालचा बच्चा आहे पण सेहवाग तर सचिनमुळे(च) क्रिकेट खेळायला लागला. मला आठवतंय मी पहिल्यांदा सचिन-सेहवागला एकत्र खेळताना पाहिलं तेव्हा इंग्लिशमधल्या अनुक्रमे मेन्टरआणि मेन्टीह्या शब्दांचा अर्थ अगदी बरोब्बर समजला. वीरूसारखा खेळाडू जेव्हा प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत असतो तेव्हा मला खूप वेळा वाटतं की खेळपट्टीच्या मधल्या भागात येऊन सचिन आणि सेहवाग एकमेकांशी नक्की काय बोलतायत ते ऐकायची सोय असायला हवी होती!

सेहवागने सांगितलेल्या एका आठवणीप्रमाणे -- ऑस्ट्रेलियात सिडनेला सचिनने नाबाद २४१ धावा ठोकल्या होत्या त्या सामन्याआधी तो वीरूला म्हणाला होता की त्या सुमारास तो कव्हर ड्राईव्ह मारताना बाद होतोय तर आता पुढच्या सामन्यात कव्हर ड्राईव्हला छुट्टी ! सेहवाग म्हणतो की आधी त्याला वाटलं सचिन मस्करी करतोय पण सिडनेला सचिन द्विशतकाच्या जवळ पोचल्यावर सेहवागच्या लक्षात आलं खरंच ह्या माणसाने कित्येक वेळा संधी मिळूनही अजून एकही कव्हर ड्राईव्ह मारला नाहीये !

खरं म्हणजे सचिनच्या बॅटिंगबद्दल वगैरे बोलायचीही आपली हैसियत नाही पण तरी मला स्वत:ला त्याच्या बॅटिंगमधल्या आवडणाऱ्या सगळ्यात मोठ्या तीन गोष्टी म्हणजे टायमिंग, प्लेसमेंट, आनंद!  त्याचे ड्राइव्ह्ज, फ्लिक्स बघणं म्हणजे अक्षरश: आनंद असतो! टायमिंग असं भन्नाट की कधी कधी तर अक्षरश: चेंडूला त्याची बॅट जणू थोपटून म्हणते, “अरे मित्रा! जा ना जरा तेवढं सीमारेषेच्या बाहेर काय आहे ते बघून ये!

क्षेत्ररक्षणाचे व्यूह कसेही बदलले तरी नक्की कुठला फिल्डर कुठे उभा आहे हे त्याला प्रत्येक वेळी माहिती असतं.! तुम्ही कुठेही फिल्डिंग लावा हो पण हा पठ्ठ्या बरोब्बर मोकळ्या जागा हेरून फटके मारणारच. शेवटी कितीही म्हणलं तरी तुमच्या गोलंदाज आणि यष्टीरक्षक सोडून नऊच क्षेत्ररक्षक ! आणि हा तर सगळं मैदान त्याचंच असल्यासारखा चेंडू फटकवणार…..तुम्ही कुठे कुठे फिल्डर उभे कराल? तुम्ही लहानपणी  ’कॅरमखेळताना, स्ट्रायकरवर हात नीट बसावा म्हणून, ’चोर-पोलिसखेळलायत? काळ्या आणि पांढऱ्या अशा सगळ्याच सोंगट्यांपैकी कुठल्याही सोंगटीला जराही धक्का लागू न देता, स्ट्रायकरने क्वीनअलगद पुढे नेत, शेवटी क्वीनपॉकेटमधे न्यायची!  सचिन जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकांमधून आरामात गॅप्स काढत चौकार मारतो तेव्हा तेव्हा मला हमखास ह्या चोर-पोलिसखेळाची आठवण येते!

आनंदाचं म्हणाल तर त्याला खेळताना बघून जाणवतं की ह्याचं क्रिकेट ह्या खेळावरच जीवापाड प्रेम आहे आणि बॅटिंगचा हा मनमुराद आनंद लुटतोय. अगदी कठीण परिस्थितीत, जिथे धावा करणं अवघड जातंय, अशा ठिकाणीही तो पाय रोवून उभा राहिल पण त्याची देहबोली सांगत असते की कुठल्याही परिस्थितीत बॅटिंग करणं त्याला आवडतंय.  ज्या माणसाला इतक्या वर्षांच्या क्रिकेटनंतरही सरावही गोष्ट सुद्धा त्रासदायक वाटत नाही, त्याला प्रत्यक्ष सामन्यातील फलंदाजी आनंद देणारच ना!

सचिनबद्दल लिहायला खरं तर खूप म्हणजे खूपच आहे पण हा लेख कुठेतरी  थांबवायलाही हवा. एक मात्र जरूर जरूर लिहावंस वाटतं आणि ते म्हणजे त्याला देवमानण्यापेक्षा, तो तुमच्या-आमच्यासारखाच माणूस आहे हे मान्य करूया ! म्हणजे निदान त्याच्यावर आपल्या अवास्तव अपेक्षांचं ओझं लादणं तरी बंद होईल ! अर्थात हेसुद्धा मान्य करूया की तो माणूसच आहे पण........ न भूतो, न भविष्यतीअसा माणूस!  त्यामुळेच तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या शतकांच्या शतकाच्या उंबरठ्यावर तो उभा आहे.  आता तो कसोटी सामन्यात किंवा एक दिवसाच्या सामन्यात फलंदाजीला आला की तुमच्या-माझ्यासारखे असंख्य लोक देव पाण्यात ठेऊन बसतील!

एक धक्का और दो सचिन .... आम्ही जगभरातले क्रिकेट रसिक, तुझ्या शंभराव्या शतकानंतर टाळ्या-शिट्टया वाजवायला, तयारच आहोत.
आणि आता….. आवर्जून बघाव्या अशा सचिनबद्दलच्या काही विडियो क्लिप्स!
'मित्र म्हणजे एक असा माणूस ज्याच्याबद्दल आपल्याला खूप आपुलकी वाटते आणि जो आपल्या आयुष्यात निखळ आनंद आणतो', अशी जर मित्राची व्याख्या केली तर
तेंडल्या ... धन्यवाद मित्रा !
-----------------------------------------
ह्या लेखात संदर्भासाठी वापरलेल्या विडियो क्लिप्स, लेख, फोटो  इ.च्या मूळ कर्त्यांचे मन:पूर्वक आभार. 
लेखाच्या सुरुवातीला वापरलेला सचिनचा फोटो ह्या संकेतस्थळावरून साभार.










Monday, November 15, 2010

शिरवळकर नावाचं गारूड


१५ नोव्हेंबर -- कै. सुहास शिरवळकरांचा जन्मदिन ! 

ह्या लेखाचे पूर्वप्रकाशन ’सुहास शिरवळकर – असे आणि तसे’ ह्या पुस्तकात झाले आहे पण ब्लॉगवर हा लेख प्रकाशित करण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस कुठला?

---------------------------------------------------------------------------
‘८५२, रविवार पेठ, पुणे’ हा पत्ता कधीच विसरणार नाही. तो सुहास शिरवळकरांच्या घराचा होता !

सुशिंची पुस्तकं वाचायला सुरूवात नक्की कुठल्या पुस्तकाने केली ते आठवत नाही, पण झपाटल्यासारखी सगळी वाचून काढली होती. एकदा / दोनदा  आणि काही पुस्तकं तर कित्येकदा ! साधारण नववीत वगैरे असेन जेव्हा मनावर ‘शिरवळकर’ नावाचं गारूड पडणं सुरू झालं होतं.

एकदा अशीच हुक्की आली की त्यांना पत्रं लिहावं.  तो पर्यंत पहिल्या फटक्यातच दहावी पास करून अकरावी सुरू झाली होती. त्यामुळे डोक्यावर दोन अदृश्य शिंगंही फुटली होती ! मग काय, मनात आलं ना , लिहिलं पत्रं आणि टाकलं बिनधास्त. मनात म्हटलं, “फारतर काय होईल? पत्राचं उत्तर येणार नाही, बास ! निदान ‘पत्र टाकायला हवं होतं’ ही रूखरूख तरी राहणार नाही. ”

पण एका दिवशी पोस्टमन पत्र  देऊन गेला. आपल्या नावाचं पत्र आलं ह्याचंच खूप अप्रूप असायचं तेव्हा ! मजकूर वाचण्याआधी नजर वेधून घेतली ती पत्राखालच्या लफ्फेदार सहीनं -  स्नेहांकित, सुहास शिरवळकर !
त्या पत्रातलं ’दुनियादारी मात्र जरूर वाच’ हे त्यांचं वाक्यं अजूनही आठवतंय.  ‘आनंद पोटात माझ्या माईना’ या ओळीचा अर्थ एका झटक्यात समजला.  

आपलं काय असतं ना, एक गोष्ट मिळाली की दुसरी मिळावी असं वाटायला लागतं ! आता वाटायला लागलं होतं की शिरवळकर प्रत्यक्ष भेटले तर काय धमाल होईल ना? पुन्हा एकदा पत्रापत्री झाली. त्यातही किडा म्हणजे साधारण १९७७ सालाच्या सुमारास त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातला काहीतरी प्रश्न विचारला होता.  शिरवळकरांनी सांगितलं एखादा रविवार गाठून साधरण चारच्या सुमारास ये.  

आम्ही चार मित्र चार वाजता म्हणजे चारच्या ठोक्याला त्यांच्या घरी हजर !  ‘रविवार दुपारची झोप’ हा काय मस्त प्रकार असतो आणि त्या झोपेतून कुणाला उठवणं म्हणजे काय पाप असतं हे कळायचं वय नव्हतं हो ते !  चार म्हणाले ना… मग आम्ही चारला हजर !  रविवारच्या झोपेतून उठायला लागूनही, चहाबरोबर आमच्याशी छान हसत, जोक्स वगैरे करत बोलणारे सुशि आवडले म्हणजे आवडलेच होते !

मग पुढे अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या  पण त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो ते कधीच विसरणार नाही. क्वचित कधीतरी अचानकही त्यांच्याकडे चक्कर व्हायची.  ते घरी असल्याची खूण म्हणजे घराबाहेर उभी असलेली त्यांची मोटरसायकल. ’बॉबी’ सिनेमातली ऋषी कपूरची मोटरसायकल आठवतीये?  सुशिंची बाईक सेम तशीच होती. अशा प्रकारच्या मोटरसायकलला, त्यांनी ’जाता-येता’ या पुस्तकात, ’बुटकं’ हे पर्फेक्ट नाव दिलंय !

अमेरिकेहून एकदा मी सुट्टीवर गेलो असताना झालेल्या धावत्या-पळत्या भेटीत तर त्यांनी ‘जाता-येता’ हे पुस्तक प्रेमाने भेट दिलं होतं ! तसंच कधी विसरणार नाही ते त्यांनी दिवाळीला पाठवलेलं ग्रिटींग कार्ड. एकतर मजकूर मराठीत होता आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वत: लिहिलेला होता !
‘मागे वळून पाहू नकोस, काजळरात्री सरल्या आहेत
सरल्या क्षणाशी रेघ मार, खिन्न दिवस लोपले आहेत….’
अशी त्या शुभेच्छांची सुरूवात होती आणि  शुभेच्छा पूर्ण करायला
‘मागे वळून पाहू नकोस, 
दिवाळीच्या स्वागताला
पाठमोरा होऊ नकोस !’  या ओळी होत्या !

शिरवळकरांच्या पुस्तकांत असं काय असायचं ज्यामुळे वाचक, विशेषत: तरूण वाचक, त्यांचे कट्टर फॅन व्हायचे? (खरंतर अजूनही होतात !)  मला स्वत:ला जाणवलं ते हे की शिरवळकरांची पात्रं तुमच्याशी बोलतायत असं वाटतं. त्यांच्या लेखनशैलीमुळे वाचकाला वाटतं आपणही या पुस्तकातलं एक पात्रं आहोत, या सगळ्या घटना जणू आपल्या आजूबाजूला घडतायत ! त्यांची भाषा ओघवती तर होतीच पण आपल्या बोलण्यातले नेहमीचे शब्द, विराम चिन्हे वगैरे या सगळ्यांसकट भाषा कागदावर यायची. ते जरी ‘लिहीत’ होते तरी वाचकाला असं वाटतं की कागदावरचा मजकूर आपल्याशी ‘बोलतोय.’  त्यामुळे बघा, त्यांच्या पुस्तकांत प्रसंगाप्रमाणे योग्य शब्दच वापरलेले दिसतील.

अगदी ढोबळ मानाने म्हणायचं तर त्यांनी दोन प्रकारचे लेखन केलं, राईट? म्हणजे बघा हं -– सामाजिक कादंबरी हा एक प्रकार आणि रहस्यकथा / थरारकथा हा दुसरा प्रकार.  फिरोज इराणी, बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन आणि दारा ’बुलंद’ ह्यांच्या करामतींचं लेखन दुसऱ्या प्रकारचं.  तर दुनियादारी, कल्पांत, क्षितीज, झूम वगैरे पहिल्या प्रकारचं लेखन. (अजून ’य’ नावं देता येतील पण तुम्हाला माहितीच आहेत की ती !)

लेखनाचा प्रकार कुठलाही असो, त्यांच्या पुस्तकांची नावं एक से एक आहेत. नुसतं ’दुनियादारी’ म्हटलं की खलास ! तसंच ’जाता-येता’, ’बरसात चांदण्याची’, ’थरारक’, ’तुकडा तुकडा चंद्र’, ’सॉरी सर’, ’ओ ! गॉड’, ’टेरिफिक’, ’गिधाड’, ‘एक… फक्त एकच’, ’तलखी’, ’म्हणून’, ’अखेर’, ’गुणगुण’, ‘थर्राट’, ’गढूळ’, ‘इथून तिथून’, ’समांतर’ ….. हॅ ! यादी पुन्हा वाढायला लागली.  एक मात्र नक्की, त्यांच्या पुस्तकाचं नाव ऐकूनच पुस्तक वाचावंस वाटायला लागतं. जसं हिंदी सिनेमा दिग्दर्शक एन. चंद्राच्या सुरूवातीच्या काळात सिनेमाच्या नावावरूनच तो पहावासा वाटायचा, म्हणजे ‘अंकुश’, ‘तेजाब’, ‘प्रतिघात’ वगैरे, तसंच !

शिरवळकरांच्या पात्रांची नावंही ’सही’ आहेत ! नायकाचे नाव आणि आडनाव एकाच अद्याक्षरावरून  किंवा नायक – नायिकेची पहिली नावं एकाच अद्याक्षरावरून हा विचित्र प्रकार त्यांनी केल्याचं आठवत नाहीये ! त्यांच्या काही पात्रांच्या नावांवरून नुसती नजर टाका -- फिरोज, अमर, मंदार, दारा, डॅनी, गोल्डी, बादल, मधुर, सलोनी, शिल्पा, रश्मी, मोहिनी, श्रेयस, दिग्या (डी.एस.पी), चंद्रवदन, गंधाली…. आणि कितीतरी अगणित नावं ! ही सगळी नावं त्या त्या पात्रासाठी चपखल आहेत… अगदी बॅ. दीक्षितही !

त्यांच्या लेखनशैलीतला मला भावलेला अजून एक भाग म्हणजे कथानकाचा वेग. कथानक उलगडताना, वातावरणनिर्मितीसाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी, ते पुस्तक कधी रेंगाळत ठेवायचे नाहीत. एकदा पुस्तक वाचायला घेतलं की ‘आता पुढे काय होणार आता’ ही उत्सुकता कायम ताणलेली राहते – मग भलेही ते पुस्तक म्हणजे एखादी सामाजिक कादंबरी असली तरी.  तसंच एखाद्या पात्राचं वेगळेपण नक्की किती एक्स्पोज करायचं आणि कुठे थांबायचं ते शिरवळकरांना चांगलं माहिती होतं. म्हणूनच तर फिरोज इराणी मोजक्या पुस्तकांत ‘बैदुल’ वापरतो किंवा बॅ. अमर विश्वास अगदी म्हणजे अगदीच मोजक्या पुस्तकांत ‘रातों का राजा’ म्हणूनही दिसतो ! एका वयात तर वाटायचं की राजस्थानला गेलो तर दारा ‘बुलंद’ भेटेलही कदाचित !!

त्यांच्या  पुस्तकांतल्या प्रस्तावना वाचणंही एक वेगळाच आनंद असतो.  प्रस्तावनेतून तर चक्क आपल्याशी one on one गप्पा करतायत असं वाटतं.  पण लोकांना आपल्या प्रस्तावना आवडतायत म्हणून त्यांनी स्वत:च्या भारंभार पुस्तकांना प्रस्तावना अजिबात लिहिल्या नाहीयेत. मगाशी म्हटलं ना की कुठे थांबायचं ते शिरवळकरांना नक्की माहिती होतं.

रसिक नजर आणि कलात्मक सौंदर्यदृष्टी ही त्यांची अजून एक खासियत. तुम्ही जर अट्टल सुशि फॅन असाल तर तुम्हाला मी काय म्हणतोय ते लगेच कळेल. एखादी हवेली, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा एखादं हिल स्टेशन मांडताना त्यांच्यातला रसिक भरात असायचा. ही तर झाली निर्जीव ठिकाणं मग मोहक नायिकेचं वर्णन किंवा डॅशिंग नायकाचं वर्णन वाचताना तर असं वाटतं की आत्ता या पात्राला भेटून/बघून यावं !

सुशिंची पुस्तकं वाचता-वाचता कित्येक वर्षं कशी गेली कळलंच नाही.  अमेरिकेला आल्यावर त्यांच्याशी अधून-मधून फोनवर बोलणं व्हायचं किंवा पुण्याला गेल्यावर एखादी धावती भेट.  एक दिवस दै. लोकसत्ताच्या वेबसाईटवरच्या बातमीतून समजलं -- सुशि गेले!! दोन हजार तीनच्या जुलै महिन्यात – अचानक, ध्यानीमनी नसताना ! आमचे अजितकाका म्हणाले होते तसं, “माणसाचं आयुष्य कधी आणि कसं संपेल ते सांगता येत नाही’ हेच खरं !  अजितकाका म्हणजे सुप्रसिद्ध बासरीवादक आणि अत्यंत सज्जन माणूस -- कै. अजित सोमण. या लेखाच्या निमित्ताने, पुन्हा एकदा, मनात अजितकाकांच्याही आठवणी आल्या.

शिरवळकरांची आठवण येत असतेच पण दीडएक वर्षापूर्वी मी मराठी ब्लॉग लिहायला सुरूवात केली तेव्हा सुशिंची खूपच आठवण आली होती.  त्यांना माझे लेखनाचे प्रयत्न दाखवायला आवडलं असतं आणि माझी खात्री आहे, त्यांनीही खूप प्रोत्साहन दिलं असतं.  सुशि जरी आता आपल्यात नसले तरी एक मात्र नक्की – त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी इतकं भरभरून लिहून ठेवलंय की ते वाचकांच्या अनेक पिढ्यांना पुरेल !

(कै. अजितकाकांबद्दलच्या सुरेल आठवणी ह्या ब्लॉगवर इथे आहेतच.)