वृत्तपत्राने दिन आरंभी । तो जाणावा येक ’मऱ्हाठी’ ।
चहासवे ‘सकाळ’ हाती । तोचि ओळखावा ’पुणेरी’ ।।
आमची महाराष्ट्रीय मंडळ शाळा सकाळी ६.५५ ते दुपारी १२.१० अशी असायची. (तेव्हा प्रश्न पडायचा की सकाळी ७ ते दुपारी १२ अशी का नाही करत?) साधारण ६:३०च्या सुमारास आमचे रिक्षावाले पायगुडेकाका यायचे. त्यांच्या आधी ५-१० मिनिटे पेपरवालेकाका ‘सकाळ’ आणायचे. वसंत ऋतुची सुगंधित पहाट असो, दात वाजवणारी थंडी असो किंवा झिमझिमता पाऊस; पेपरवालेकाका आणि डोक्याला मुंडासं बांधलेले, दुधाची चरवी आणणारे उंचपुरे ‘गवळीबाबा’ वेळ चुकवायाचे नाहीत. अगदीच मुसळधार पाऊस असला तर मात्र त्यांचाही नाइलाज असणार. पेपर हातात आल्यापासून रिक्षा येईपर्यंत पटापट पहिल्या आणि शेवटच्या पानावरच्या बातम्यांच्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या, अनुक्रमे मुख्य आणि क्रीडा विषयक बातम्यांसाठी. ‘पेज थ्री’ एकतर नव्हतं किंवा ते कळायचं वय नव्हतं. काही वर्षांनंतर सायकलने शाळेत जायला लागल्यावर ‘हेड लाइन्स’ वाचूनच घरून निघायचं. मग शाळेची वेळ गाठायला सायकल जोरजोरात हापसायला लागली तरी चालायचं.
दुपारी घरी आल्यावर दप्तर टाकायचं आणि हात-पाय धुवून पेपर उचलायचा. दुपारभर मी आणि आजीच घरी असायचो. देवासमोर वेगवेगळी स्तोत्रं, आरत्या म्हणणारी किंवा कहाण्या वाचणारी आजी आणि ’शेषशायी’ विष्णूसारखा कॉटवर लवंडून ‘सकाळ’ वाचणारा मी !!! आधी सगळ्या पानांवरच्या नुसत्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या. नंतर मनात नोंदवलेल्या बातम्या पूर्ण वाचायच्या. तासभर मनासारखा पेपर वाचून झाल्यावरच शाळेचा युनिफ़ॉर्म बदलून जेवायचो. ‘रविवार सकाळ’ म्हणजे तर मेजवानीच असायची. ‘सकाळ’ मधली ‘वाचकांची पत्रे’ हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. क्रिकेटच्या बातम्या वाचाताना खूप एक्साइट्मेंट असायची. ‘मुदस्सर नझर त्रिo कपिल देव ५’ किंवा ‘प्रतिकूल स्थितीत सुनीलचं जिद्दी शतक’ वगैरे वाचताना आपलीच छाती वीतभर वाढायची. साध्या-सोप्या पण छान छान गोष्टींचं मासिक ‘चांदोबा’ आणि संदीप पाटीलचं पाक्षिक ‘एकच षटकार’ ह्याची तर चातकासारखी वाट पहायचो. मुळात आवड होतीच पण द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर, मकरंद वायंगणकर ह्यांच्यामुळे क्रिकेटची ‘नजर’ यायला लागली. मग ‘चंदेरी’ मिळायला लागलं. चित्रपट विषयक दर्जेदार लेखन वाचायची सवय लागली. कॉलेजला असताना ‘सवाई गंधर्व’साठी रात्रभर जागून आलं की, कार्यक्रमांची नशा डोक्यात असतानाच, ‘सकाळ’च्या वृत्तांतातून मनात पुन्हा आदल्या रात्रीचं चांदणं फुलायचं.
नववी-दहावीत एकदम साक्षात्कार झाला की ‘केसरी’ आणि ‘तरूण भारत’ मध्ये दहावीच्या अभ्यासाबद्दल बरंच काही चांगलं येतं. नमुना प्रश्नपत्रिका वगैरे सोडवायच्या. त्यातही, लोकमान्यांचा ‘केसरी’ हातात घेताना प्रत्येक वेळी मनात आदरभाव असायचा.
ते वय बरेच मानसिक आणि शारीरिक साक्षात्कार व्हायचं असतं. कॉलेजमधे असताना हिंदी चित्रपट बघायचं वेड लागलं. (ते अजूनही आहे म्हणा.) ताजे चित्रपट कुठल्या टॉकीजला लागले आहेत ते शोधायला शुक्रवारच्या ‘प्रभात’ सारखा दुसरा पेपर नव्हता. पुण्यात बऱ्याच ठिकाणी ‘सार्वजनिक वाचनालयं’ आहेत. म्हणजे रस्त्याच्या कडेला भिंतीवर लाकडी फळ्यांचे कप्पे ठोकून त्यात मराठी पेपर फुकटात वाचायला ठेवलेले असतात आणि बसायला एखादा बाक. काही ठिकाणी बाजूलाच १-२ उभे रांजण आणि साखळीनं बांधून ठेवलेले स्टीलचे ग्लास अशी पाणपोई. एकाच पेपरची पानं चार-पाच वेगवेगळ्या लोकांकडे. आपलं पान वाचून झालं की दुसऱ्याला द्यायचं. ’प्रभात’ नक्की वाचायला मिळणारी दुसरी ठिकाणं म्हणजे ’अमृततुल्य’ ! चहा, क्रीम रोल आणि ’प्रभात’ साठी ’अमृततुल्य’चा कट्टा बेस्ट. वीस-एक वर्षांपूर्वी तरी ‘प्रभात’चे वाचक तीन प्रकारचे होते. एक म्हणजे “हे…आपलं जरा टाईमपास” म्हणणारे ’रिकामटेकाडचे किल्लेदार’. दुसरे म्हणजे ’कल्याण बाजार’ वगैरेचे सांकेतिक आकडे समजणारे ‘मटकाबहाद्दर’ आणि तिसरे आमच्या सारखे ’सिनेदार’. कुठला सिनेमा कुठे लागला आहे ते बघून ठेवायचं. टॉकीज शोधण्यासाठी पुण्याचे गल्ली-बोळ आणि कँप ते पार खडकी-दापोडी पर्यंतचे रस्ते पालथे घातले. रस्ता चुकलो किंवा माहिती नाही असं वाटलं तर जवळपासच्या रिक्षावाल्यांना विचारायचं; एकदम perfect directions मिळायच्या. ‘प्रभात’ मध्ये तर चित्रपटाचं नाव आणि फोटोबरोबर १-२ ओळींत जाहिरातही असायची. म्हणजे काहीतरी असं --
“संपूर्ण कुटुंबाने पहावा असा -- हम आपके हैं कौन” !
“अभिनयाच्या ’शहेनशाह’चा आता ‘अग्निपथ’ !
“कुर्बानी ! तुफान दन्नादन्नी !! विनोद खन्ना, फिरोज खान आणि ’चिकणी झीन्नी’ झीनत अमान”!
काही वर्षांनंतर रोज संध्याकाळी बातम्या आणि गावगप्पा (gossips) कळायला लागल्या; पुण्यात ‘संध्यानंद’ मिळायला लागला. (जाहिरात असायची -- आज का आनंद ‘संध्यानंद’). आता माहिती नाही पण ‘तीन डोक्यांच्या कुत्र्याचा अमेरिकेत जन्म’ किंवा ‘बर्म्युडा ट्रॅंगलचा अजून एक रहस्यमय बळी’ वगैरे अशा प्रकारच्या (बीबीसीलाही न मिळणाऱ्या) बातम्या असायच्या !!!
सुट्टीत मुंबईला गेलो की ‘महाराष्ट्र टाइम्स’ (जाहिरात -- ‘पत्र’ नव्हे, ‘मित्र’), ‘लोकसत्ता’, ‘नवा काळ’ किंवा ‘सामना’ (हिंदूह्रुदयसम्राटांचा) असे पेपर्स वाचायला मिळायचे. तीन घड्या घातलेले ह्या पेपर्सपैकी एक किंवा Indian Express / Times of India मुंबईकरांच्या काखोटीला हमखास असायचे. मुंबईतल्या पेपर्सचे fonts पुण्यातल्या पेपर्सच्या फॉंट्सपेक्षा वेगळे असायचे. (मुंबईतला कुत्रासुध्दा जागेअभावी शेपटी उभीच हलवतो ना, तसंच काहीसं !! Just kidding J ) खरं सांगायचं तर मुंबईचे पेपर्स तेव्हा कधीही ‘आपले’ वाटले नाहीत. अर्थात मुंबईच्या आत्या, मामा, मावशी ह्यांपैकी कोणीही पुण्याला आले की त्यांना ‘लोकसत्तेत’ किंवा ‘मटा’मधे काय आलंय ते वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही !!
Enligsh वर्तमानपत्रांशी आपला संबंध म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’! नाही म्हणायला मधेच कधीतरी हुक्की यायची आणि ‘Times of India’ किंवा ‘Indian Express’चं दर्शन घ्यायचो. जुन्या मॅट्रिकपर्यंतच शिकूनही अप्पांचं English खूप छान होतं; विशेषत: English grammer. त्यांना कुठलाही शब्द विचारला की नक्की म्हणायचे, “पूर्णं वाक्य काय आहे?” शब्दांपेक्षा वाक्य आणि वाक्यांपेक्षा अर्थ पाहायला त्यांनी नकळत शिकवलं! मला किंवा मंदारला शब्द अडला की त्यांचा आधी भर असायचा dictionary उघडून आम्हीच अर्थ शोधण्यावर. कधी कधी कळायचंच नाही, आपण पेपर वाचतोय की डिक्शनरी? नवीन शब्द अडला की त्याचा अर्थ साधारणपणे कुठल्या पानावर सापडेल ते मात्र पक्कं समजायला लागलं. ‘Practice makes a man perfect’, दुसरं काय!
अमेरिकेत आल्यावर तर गेल्या काही वर्षांत electronic media ने जणू ‘अलिबाबाची गुहा’ उघडून दिली. ‘तिळा तिळा, दार उघड’ च्या चालीवर नुसतं ‘गुगल गुगल, साईट उघड’ म्हणायचं !!! सकाळ, लोकसत्ता, मटा, सामना !!! सगळ्यांच्या वेब साईट्स आहेत. नागपूरच्या मित्रांची ‘येतो नं बे तू?’ अशी प्रेमळ धमकी ऐकतानाच त्यांचा ‘लोकमत’ सापडला. दर आठवड्याला ‘लोकप्रभा’ मिळायला लागला. Rediff, BBC, CNN वगैरे तर मिळालंच पण फक्त क्रिकेटसाठी ‘क्रिक इन्फो’ किंवा ‘क्रिक बझ’ मिळाले. You Tube’ ही तर जणू ‘अलिबाबाची दुसरी गुहा’ सापडली.
मध्यंतरी कुठेतरी एक फार छान लेख वाचला होता. वृत्तपत्रच काय पण जगभर सगळ्यांचं एकंदर वाचन कमी झालं आहे असा ओरडा आपण नेहमीच ऐकतो. त्या लेखात होतं की वाचन कमी झालं नाहीये तर वाचनाचं माध्यम बदलत चाललंय. छापील वृत्तपत्र नाही वाचलं तरी लोक web sites बघतातच. पुस्तक ‘वाचायला’ वेळ मिळत नसेल तर आपण अट्टल लोक ‘audio book’ ऐकतो ना तसंच! अमेरिकेतून भारतातल्या बातम्या वाचणं म्हणजे तर जणू ‘उद्याची बातमी आजच मिळणं’ !!!
चहासवे ‘सकाळ’ हाती । तोचि ओळखावा ’पुणेरी’ ।।
आमची महाराष्ट्रीय मंडळ शाळा सकाळी ६.५५ ते दुपारी १२.१० अशी असायची. (तेव्हा प्रश्न पडायचा की सकाळी ७ ते दुपारी १२ अशी का नाही करत?) साधारण ६:३०च्या सुमारास आमचे रिक्षावाले पायगुडेकाका यायचे. त्यांच्या आधी ५-१० मिनिटे पेपरवालेकाका ‘सकाळ’ आणायचे. वसंत ऋतुची सुगंधित पहाट असो, दात वाजवणारी थंडी असो किंवा झिमझिमता पाऊस; पेपरवालेकाका आणि डोक्याला मुंडासं बांधलेले, दुधाची चरवी आणणारे उंचपुरे ‘गवळीबाबा’ वेळ चुकवायाचे नाहीत. अगदीच मुसळधार पाऊस असला तर मात्र त्यांचाही नाइलाज असणार. पेपर हातात आल्यापासून रिक्षा येईपर्यंत पटापट पहिल्या आणि शेवटच्या पानावरच्या बातम्यांच्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या, अनुक्रमे मुख्य आणि क्रीडा विषयक बातम्यांसाठी. ‘पेज थ्री’ एकतर नव्हतं किंवा ते कळायचं वय नव्हतं. काही वर्षांनंतर सायकलने शाळेत जायला लागल्यावर ‘हेड लाइन्स’ वाचूनच घरून निघायचं. मग शाळेची वेळ गाठायला सायकल जोरजोरात हापसायला लागली तरी चालायचं.
दुपारी घरी आल्यावर दप्तर टाकायचं आणि हात-पाय धुवून पेपर उचलायचा. दुपारभर मी आणि आजीच घरी असायचो. देवासमोर वेगवेगळी स्तोत्रं, आरत्या म्हणणारी किंवा कहाण्या वाचणारी आजी आणि ’शेषशायी’ विष्णूसारखा कॉटवर लवंडून ‘सकाळ’ वाचणारा मी !!! आधी सगळ्या पानांवरच्या नुसत्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या. नंतर मनात नोंदवलेल्या बातम्या पूर्ण वाचायच्या. तासभर मनासारखा पेपर वाचून झाल्यावरच शाळेचा युनिफ़ॉर्म बदलून जेवायचो. ‘रविवार सकाळ’ म्हणजे तर मेजवानीच असायची. ‘सकाळ’ मधली ‘वाचकांची पत्रे’ हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. क्रिकेटच्या बातम्या वाचाताना खूप एक्साइट्मेंट असायची. ‘मुदस्सर नझर त्रिo कपिल देव ५’ किंवा ‘प्रतिकूल स्थितीत सुनीलचं जिद्दी शतक’ वगैरे वाचताना आपलीच छाती वीतभर वाढायची. साध्या-सोप्या पण छान छान गोष्टींचं मासिक ‘चांदोबा’ आणि संदीप पाटीलचं पाक्षिक ‘एकच षटकार’ ह्याची तर चातकासारखी वाट पहायचो. मुळात आवड होतीच पण द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर, मकरंद वायंगणकर ह्यांच्यामुळे क्रिकेटची ‘नजर’ यायला लागली. मग ‘चंदेरी’ मिळायला लागलं. चित्रपट विषयक दर्जेदार लेखन वाचायची सवय लागली. कॉलेजला असताना ‘सवाई गंधर्व’साठी रात्रभर जागून आलं की, कार्यक्रमांची नशा डोक्यात असतानाच, ‘सकाळ’च्या वृत्तांतातून मनात पुन्हा आदल्या रात्रीचं चांदणं फुलायचं.
नववी-दहावीत एकदम साक्षात्कार झाला की ‘केसरी’ आणि ‘तरूण भारत’ मध्ये दहावीच्या अभ्यासाबद्दल बरंच काही चांगलं येतं. नमुना प्रश्नपत्रिका वगैरे सोडवायच्या. त्यातही, लोकमान्यांचा ‘केसरी’ हातात घेताना प्रत्येक वेळी मनात आदरभाव असायचा.
ते वय बरेच मानसिक आणि शारीरिक साक्षात्कार व्हायचं असतं. कॉलेजमधे असताना हिंदी चित्रपट बघायचं वेड लागलं. (ते अजूनही आहे म्हणा.) ताजे चित्रपट कुठल्या टॉकीजला लागले आहेत ते शोधायला शुक्रवारच्या ‘प्रभात’ सारखा दुसरा पेपर नव्हता. पुण्यात बऱ्याच ठिकाणी ‘सार्वजनिक वाचनालयं’ आहेत. म्हणजे रस्त्याच्या कडेला भिंतीवर लाकडी फळ्यांचे कप्पे ठोकून त्यात मराठी पेपर फुकटात वाचायला ठेवलेले असतात आणि बसायला एखादा बाक. काही ठिकाणी बाजूलाच १-२ उभे रांजण आणि साखळीनं बांधून ठेवलेले स्टीलचे ग्लास अशी पाणपोई. एकाच पेपरची पानं चार-पाच वेगवेगळ्या लोकांकडे. आपलं पान वाचून झालं की दुसऱ्याला द्यायचं. ’प्रभात’ नक्की वाचायला मिळणारी दुसरी ठिकाणं म्हणजे ’अमृततुल्य’ ! चहा, क्रीम रोल आणि ’प्रभात’ साठी ’अमृततुल्य’चा कट्टा बेस्ट. वीस-एक वर्षांपूर्वी तरी ‘प्रभात’चे वाचक तीन प्रकारचे होते. एक म्हणजे “हे…आपलं जरा टाईमपास” म्हणणारे ’रिकामटेकाडचे किल्लेदार’. दुसरे म्हणजे ’कल्याण बाजार’ वगैरेचे सांकेतिक आकडे समजणारे ‘मटकाबहाद्दर’ आणि तिसरे आमच्या सारखे ’सिनेदार’. कुठला सिनेमा कुठे लागला आहे ते बघून ठेवायचं. टॉकीज शोधण्यासाठी पुण्याचे गल्ली-बोळ आणि कँप ते पार खडकी-दापोडी पर्यंतचे रस्ते पालथे घातले. रस्ता चुकलो किंवा माहिती नाही असं वाटलं तर जवळपासच्या रिक्षावाल्यांना विचारायचं; एकदम perfect directions मिळायच्या. ‘प्रभात’ मध्ये तर चित्रपटाचं नाव आणि फोटोबरोबर १-२ ओळींत जाहिरातही असायची. म्हणजे काहीतरी असं --
“संपूर्ण कुटुंबाने पहावा असा -- हम आपके हैं कौन” !
“अभिनयाच्या ’शहेनशाह’चा आता ‘अग्निपथ’ !
“कुर्बानी ! तुफान दन्नादन्नी !! विनोद खन्ना, फिरोज खान आणि ’चिकणी झीन्नी’ झीनत अमान”!
काही वर्षांनंतर रोज संध्याकाळी बातम्या आणि गावगप्पा (gossips) कळायला लागल्या; पुण्यात ‘संध्यानंद’ मिळायला लागला. (जाहिरात असायची -- आज का आनंद ‘संध्यानंद’). आता माहिती नाही पण ‘तीन डोक्यांच्या कुत्र्याचा अमेरिकेत जन्म’ किंवा ‘बर्म्युडा ट्रॅंगलचा अजून एक रहस्यमय बळी’ वगैरे अशा प्रकारच्या (बीबीसीलाही न मिळणाऱ्या) बातम्या असायच्या !!!
सुट्टीत मुंबईला गेलो की ‘महाराष्ट्र टाइम्स’ (जाहिरात -- ‘पत्र’ नव्हे, ‘मित्र’), ‘लोकसत्ता’, ‘नवा काळ’ किंवा ‘सामना’ (हिंदूह्रुदयसम्राटांचा) असे पेपर्स वाचायला मिळायचे. तीन घड्या घातलेले ह्या पेपर्सपैकी एक किंवा Indian Express / Times of India मुंबईकरांच्या काखोटीला हमखास असायचे. मुंबईतल्या पेपर्सचे fonts पुण्यातल्या पेपर्सच्या फॉंट्सपेक्षा वेगळे असायचे. (मुंबईतला कुत्रासुध्दा जागेअभावी शेपटी उभीच हलवतो ना, तसंच काहीसं !! Just kidding J ) खरं सांगायचं तर मुंबईचे पेपर्स तेव्हा कधीही ‘आपले’ वाटले नाहीत. अर्थात मुंबईच्या आत्या, मामा, मावशी ह्यांपैकी कोणीही पुण्याला आले की त्यांना ‘लोकसत्तेत’ किंवा ‘मटा’मधे काय आलंय ते वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही !!
Enligsh वर्तमानपत्रांशी आपला संबंध म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’! नाही म्हणायला मधेच कधीतरी हुक्की यायची आणि ‘Times of India’ किंवा ‘Indian Express’चं दर्शन घ्यायचो. जुन्या मॅट्रिकपर्यंतच शिकूनही अप्पांचं English खूप छान होतं; विशेषत: English grammer. त्यांना कुठलाही शब्द विचारला की नक्की म्हणायचे, “पूर्णं वाक्य काय आहे?” शब्दांपेक्षा वाक्य आणि वाक्यांपेक्षा अर्थ पाहायला त्यांनी नकळत शिकवलं! मला किंवा मंदारला शब्द अडला की त्यांचा आधी भर असायचा dictionary उघडून आम्हीच अर्थ शोधण्यावर. कधी कधी कळायचंच नाही, आपण पेपर वाचतोय की डिक्शनरी? नवीन शब्द अडला की त्याचा अर्थ साधारणपणे कुठल्या पानावर सापडेल ते मात्र पक्कं समजायला लागलं. ‘Practice makes a man perfect’, दुसरं काय!
अमेरिकेत आल्यावर तर गेल्या काही वर्षांत electronic media ने जणू ‘अलिबाबाची गुहा’ उघडून दिली. ‘तिळा तिळा, दार उघड’ च्या चालीवर नुसतं ‘गुगल गुगल, साईट उघड’ म्हणायचं !!! सकाळ, लोकसत्ता, मटा, सामना !!! सगळ्यांच्या वेब साईट्स आहेत. नागपूरच्या मित्रांची ‘येतो नं बे तू?’ अशी प्रेमळ धमकी ऐकतानाच त्यांचा ‘लोकमत’ सापडला. दर आठवड्याला ‘लोकप्रभा’ मिळायला लागला. Rediff, BBC, CNN वगैरे तर मिळालंच पण फक्त क्रिकेटसाठी ‘क्रिक इन्फो’ किंवा ‘क्रिक बझ’ मिळाले. You Tube’ ही तर जणू ‘अलिबाबाची दुसरी गुहा’ सापडली.
मध्यंतरी कुठेतरी एक फार छान लेख वाचला होता. वृत्तपत्रच काय पण जगभर सगळ्यांचं एकंदर वाचन कमी झालं आहे असा ओरडा आपण नेहमीच ऐकतो. त्या लेखात होतं की वाचन कमी झालं नाहीये तर वाचनाचं माध्यम बदलत चाललंय. छापील वृत्तपत्र नाही वाचलं तरी लोक web sites बघतातच. पुस्तक ‘वाचायला’ वेळ मिळत नसेल तर आपण अट्टल लोक ‘audio book’ ऐकतो ना तसंच! अमेरिकेतून भारतातल्या बातम्या वाचणं म्हणजे तर जणू ‘उद्याची बातमी आजच मिळणं’ !!!