Tuesday, December 11, 2007

आयुष्यावर खूप काही…

‘जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही…चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…’

कवी संदीप खरे, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि तबल्यावर आदित्य आठले ह्या तिघांनी एकाच दिवशी लागोपाठ ३/३ तास प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवले. ‘आयुष्यावर बोलू काही..’ हा कविता-गाण्यांचा कार्यक्रम आपल्या MVCC इथे हाऊसफ़ुल्ल सक्सेसफुल झाला. रसिकांमधे तरूण वर्ग मोठया प्रमाणात होता हे ठळकपणे जाणवलं. कार्यक्रम इतका successful झाला की संदीप, सलील आणि आदित्यने रसिकांना पुढील वर्षी इथे सलग सहा तासांचा कार्यक्रम करण्याचा ‘वादा’ केला.

संदीप, सलील आणि आदित्य ! शिक्षणाने अनुक्रमे इलेक्ट्रिकल इंजिनीयर, डॉक्टर आणि कॉंप्युटर तज्ज्ञ! ह्या तीन तरूणांच्या शब्द-सूर-तालानी सगळ्यांना भारलं. संदीपच्या मनस्वी कविता ‘समजून घेऊन’ योग्य चाली लावायला प्रतिभावान संगीतकार सलील भेटला आणि ‘आयुष्यावर बोलू काही…’ साकारला. कार्यक्रमातल्या काही गाण्यांना सलीलचं संगीत होतं तर काहींना संदीपचं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, “रंगमंचावर कुणीही स्त्री नसतानाही तुम्ही आला आहात म्हणजे तुम्हाला गाणं खरंच ‘ऐकायला’ आवडतं” अशी खसखस पिकवत सलीलनं श्रोत्यांना आपलंसं केलं. (इथे तिघांचाही उल्लेख एकेरी आहे; ‘सचिन आज काय मस्त खेळला’ असं आपण आपलेपणानं म्हणतो ना तसाच.) ‘जरा चुकीचे…’नं सुरू झालेला कार्यक्रम पुढे रंगतच गेला.

‘दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर…निळे निळे गार गार पावसाचे घरदार..सरीवर सर.’.
दुसऱ्याच कवितेपासून सगळे ठेका धरू लागले. ‘पाऊस असा रुणझुणता..’ साठी सलीलनं ‘मल्हार’ आणि ‘जयजयवंती’ अशा मिश्र रागांची सुरेख चाल लावली तर ‘मनाचे श्लोक’ ज्या ‘भुजंगप्रयात’ वृत्तात आहेत त्यात संदीपने ‘पावसाचे श्लोक’ बांधले. सलीलच्या शब्दांत म्हणजे, “मनातलीचे श्लोक आहेत.“
वानगीदाखल पहा -- प्रिये ये निघोनी, घनांच्या कडेनी….मला एकटेसे अता वाटताहे !!
‘लहान मुलांसाठी सोपं लिहिणं अवघड असतं’ ह्याचा प्रत्यय देणारी बालगीतं आली. खूप ताकदवान पण एकटा, एकाकी सुपरमॅन आणि मग त्याला भेटलेला हनुमान सगळ्यांना खूपच भावला. ‘अग्गोबाई, डग्गोबाई..’ला सलील लहान मुलांचं item song म्हणतो तर ‘मी पप्पांचा ढापून फोन…फोन केले एकशे दोन’ हसवता हसवता टचकन डोळ्यांत पाणी आणतं.

त्यानंतर गझलच्या आकृतिबंधात प्रेमकविता आली. ‘मेघ नसता, वीज नसता, मोर नाचू लागले…जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले…!’ इथे संदीपच्या शब्दांतून प्रेम इतकं नाजूकपणे येतं की ‘रंग देखील पाकळ्यांना भार वाटू लागले’ !

शेतकरी आणि भाजीवाल्याच्या गाण्यात, प्रेम व्यक्त करायला त्यांनी दिलेल्या उपमांनी, हसताना ‘डिब्बाडी…ढिप्पांग’ ह्या तालावर टाळ्या-शिट्ट्यांनी मन नाचू लागलं. एका कवितेत गाडी सुटल्यावर ‘फलाटावर निश्वासांचा कचरा झाला’ हे लिहिणारा संदीप हळवा असतो. सगळ्या नवऱ्यांना आवडलेलं (किंबहुना पटलेलं !), ‘जीवनातलं प्रखर वास्तव’ हे विशेषण सलीलनं बायकोबद्दल वापरलं तरी कधी खोडकर, कधी कटकटी वाटणारी बायको आसपास नसली की मात्र नवरा अस्थिर होतो. ’नसतेस घरी तू जेव्हा , जीव तुटका तुटका होतो…जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो’.

चाकोरीबध्द कारकुनी मनोवृत्तीवर, ‘कंटाळरसा’मधे, ‘आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो…’ असं संदीप लिहितो तर माणसांच्या आत्मकेंद्रीपणावर तो म्हणतो ‘मी धुकेही पाहिले, मी धबधबेही पाहिले….पण शेवटी मी, माझाच फोटो काढला’ !! ‘मी मोर्चा नेला नाही..’ कवितेत, माणसांच्या सामान्यच राहण्याच्या वृत्तीवर तो मार्मिकपणे म्हणतो.. “मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो, मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो…मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही, मी कांदा झालो नाही! आंबाही झालो नाही!”

‘भल्या पहाटे.. छातीमध्ये..जळजळणारे अल्कोहोल’ हे अमेरिकन ‘हिप हॉप’ स्टाइलमधे होतं तर ‘दीवानों की बाते हैं.. इनको लब पे लाए कौन? इतना गहरा जाए कौन? खुदको यूँ उलझाए कौन?’ ही अस्सल उर्दू गझल होती. ‘दिख जाए तू गर पलभर..मयखानेमें जाए कौन !” वाह जनाब ! क्या बात है! ह्या गझलला खास आदित्यच्या तबल्यासाठी जोरदार टाळ्या पडल्या.

सलील म्हणाला त्याप्रमाणे ‘जरीची साडी नेसून, गोड आवाजाने आपल्यावर जणू मोरपीस फिरवणारी निवेदिका’ अशा टिपिकल ढाच्यात कार्यक्रम न अडकवता श्रोत्यांशी मस्त गप्पा करत, विनोदी चुटके आणि पुणेरी किस्से सांगत, एकमेकांना कोपरखळ्या मारत, त्यांनी जादूगाराच्या पोतडीसारखी एकाहून एक सरस कविता, गाणी काढली. ६ ऑक्टोबर हा सलीलचा वाढदिवस असल्याने, त्याने खास स्वत:च्या आवडीची कविता घेतली, ‘आताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते….बरा बोलता बोलता स्तब्ध होतो, कशी शांतता शून्य शब्दांत येते’.

अशा रंगलेल्या मैफिलीची सांगता हे नक्की कशी करतील ही खूप उत्सुकता होती. जादूगारांनी पोतडी पुन्हा उघडली आणि बाहेर आली, सहसा न भेटणारी, मराठी साजातली....कव्वाली !! बेधुंद आयुष्य जगताना, मोहासाठी देह तारण ठेवत सुंदरतेवर जगणे चक्काचूर करणाऱ्या वृत्तीची…कव्वाली !!
“जपत किनारा शीड सोडणे नामंजूर, अन वाऱ्याची वाट पहाणे नामंजूर,
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, येईल त्या लाटेवर झुलणे नामंजूर , नामंजूर !!!”

6 comments:

Anonymous said...

Hello Sandeep,


Nice of you to post the review here. I liked it a lot and am sure Sandeep will too. Your other works-the prose and poetry, that you have posted on this blog are quite impressive. I will surely try and visit your blog every few days.

Take care,
Ruee Gawarikar

Anonymous said...

Wah Jawab Nahi !!! I Enjoyed reading but also was sorry for missing the program.
-- Tejoo.

ओहित म्हणे said...

ha karykram baghaycha barech veLa rahun gela ... tyabaddal lihilya baddal dhanyvaad ...!

baki 'naamanjur' kavvali aaNi 'tujhya majhya save' he kevaL apratim!!

jarur aik ...

Anonymous said...

Sandeep,

This program is definitely apratim but your article covering it is equally apratim.

You are gifted like P.L. You are a sutradhar for "Hidden Gems, Sensitive poet and now a blogger with deep knowledge of hindustani classical. Your articles are very interesting due to the "alankaric" language that you use.

Keep it up. Although your artilces are very interesting, I am looking forward to a book from you like "Laghu Katha or Kavita Sangraha"

Sanjeev Rege

rutujaj said...

Nice to read the review, though we didn't attend the program...your review almost made it seem like we did!
Rutuja

मिलिंद छत्रे said...

संदिप छान लिहिले आहेस.. अगदी समग्र वृत्तांत...

कार्यक्रम एकदा बघितलाच आहे... गाणी तर कित्येक वेळा कॅसेट्वर ऐकली आहेत व विडंबित पण केली आहेत :)

आता परत कधी पहायचा योग येतोय बघुया