Friday, July 18, 2008

पानसेबाई

“अरे व्वा ! शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले. आपल्या तिसरीच्या बाई अजून कुणालाच ‘चेंगट’ किंवा ‘शुंभ’ म्हणाल्या नाहीयेत !”

पानसेबाईंची पहिली आठवण मनात ठसलीय ती अशी !!

कोवळ्या वयाचं मन अगदी टीपकागद असतं ! चांगलं-वाईट जे कानावर पडेल तर अगदी आतपर्यंत शोषलं जातं. दुखऱ्या शब्दाने टच्चकन पापणीत येतं आणि हसऱ्या शब्दाने डोळ्यांत आभाळ मावतं !

आमच्या पानसेबाई दिसायला कशा होत्या सांगू? अशा छान शिडशिडीत होत्या. रंगाने तांदळापेक्षा गव्हाजवळच्या होत्या. पाठीचा कणा ताठ होता. चालणं झपझप नि हालचाली झटपट होत्या. आवाज खणखणीत होता पण बोलणं मात्र मृदू होतं. खरंतर नुसतंच आवाज खणखणीत होता हे सांगून भागणार नाही. त्यांच्या आवाजाला एक नादमय गोडवा होता. मुख्य म्हणजे वाणी अगदी स्पष्ट होती. खरंतर त्यांची निवृत्ती काही वर्षांपलीकडेच उभी होती, पण ती जाणीव फक्त चेहऱ्यावरच्या काही सुरकुत्यांना आणि केसांच्या चांदीला होती. त्या केसांचा नीट बसवलेला छोटा अंबाडा बांधायच्या आणि ह्या सगळ्या वर्णनाला योग्य अशी नऊवारी साडी नेसायच्या. नऊवारी साडीमुळे तर त्या आम्हाला शाळेत शिकवणाऱ्या आजीच वाटायच्या ! त्यांच्या हाती एक छोटी कापडी पिशवी असायची.

पानसेबाईंच्या शिकवण्याबद्दल तर काय सांगू? म्हणायच्या जे आवडेल ते आधी कर ! त्या सगळ्या मुलांच्या पालकांना एक आवर्जून सांगायच्या की मुलं अभ्यास करतात हो, फक्त त्यांना गोडी लागायला पाहिजे. ती गोडी कशी लागेल तेव्हढं आपण बघायचं. तेव्हा नीट कळायचं नाही पण आता समजतं की किती मोठी गोष्ट त्या सोप्या भाषेत सांगायच्या. नुसत्या सांगायच्या नाहीत तर आमच्याबरोबर रोज जगायच्या. ‘तारे जमीन पर’ बघताना पानसेबाईंची खूप आठवण आली. त्यातला ‘राम शंकर निकुंभ’तरी वेगळं काय म्हणत होता? मुलांचं शक्तिस्थान नीट वापरलं तर त्याचा उपयोग इतर ठिकाणीही करता येतो !!!

एखादा मुलगा खिडकीतून बाहेर बघत बसला असेल तर थोडा वेळ त्याला तसंच बघू द्यायच्या. उगाच ओरडून त्याची तंद्री भंग नाही करायच्या. मग त्याच्या जोडीला सगळ्या वर्गालाच बाहेर बघू द्यायच्या. झाडावरचा एखादा पक्षी दाखवायच्या. मोकळ्या मैदानापलीकडल्या रस्त्यावरून धावणारी लालचुटूक बस दाखवायच्या. मग बोलता-बोलता अलगद सगळ्यांचं लक्ष, त्या जे काही वर्गात शिकवत असतील त्याकडे, वळवायच्या. खिडकीबाहेर बघायला सुरूवात केलेला मुलगाही आपोआप परत मनानेही वर्गात यायचा !

लहानपणी आपण खूपदा ऐकतो की अक्षर कसं मोत्याच्या दाण्यासारखं हवं ! पानसेबांईंचं अक्षर तसंच होतं … मोत्याच्या दाण्यासारखं ! नुसतं वहीतलंच नाही तर फळ्यावर लिहिलेलंसुध्दा !! बरेचदा असं दिसतं की फळ्यावर लिहिताना अक्षर नीट येत नाही. काहीजण टेकडी चढतात तर काही टेकडी उतरतात !!! काहींचं अक्षर लहान आकारापासून सुरू होतं ते मोठं होत जातं ! काहींचा हत्ती निघतो आणि पूर्णविरामापाशी मुंगी पोचते !!! सलग एका ओळीत, एका मापाची अक्षरं लिहू शकणारे कमीच ! पानसेबाईंना फळ्यावर लिहिताना पाहूनच शिकलो की, पेनने वहीवर लिहिताना, पेन धरलेला हात आपण वहीवर टेकवतो पण फळ्यावर हात टेकवायचा नसतो .. फक्त खडू टेकवायचा आणि लिहायचं !

मला वाटतं पानसेबाई सगळ्या मुलांना खूप आवडायच्या त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्या प्रत्येकातलं वेगळेपण शोधायच्या, जपायच्या आणि जोपासायच्याही. माझ्यापुरतं सांगायचं तर पानसेबाईंनी बहुतेक लगेच ओळखलं की ह्याला अभ्यास करण्यापेक्षा पुस्तकं वाचायला आवडतं आणि धड्यातली उत्तरं पाठ करण्यापेक्षा भाषणाचं पाठांतर आवडतंय. वक्तृत्वस्पर्धा आणि नाटकांमधे भाग घेण्यासाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं. कधी त्यांना मोकळा तास असला तर स्वत: जरा आराम करण्याऐवजी नाटक, भाषण असली खुडबूड करणाऱ्या आम्हा पोरांवर मेहनत घेत बसायच्या.

मला आठवतंय त्या वर्षी शाळेच्या गॅदरिंगला त्यांनी मला ‘सिंहगडचा शिलेदार’ असं भाषण दिलं होतं. ते शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं स्वगत अशा प्रकारचं होतं. भाषण पाठ करून घेणं आणि आवाजातले चढ-उतार ह्यावर शाळेत पानसेबाईंनी आणि घरी आईने जातीने लक्ष दिलं होतं. माझी आईसुद्धा शिक्षिका असल्याने शाळेत आणि घरीही शिक्षिकांचं जातीनं लक्ष होतं. आईनं खूप हौसेनं मावळ्याचा पांढरा ड्रेस, कमरेला शेला, खोटी तलवार, डोक्यावर आडवी पगडी वगैरे असं सगळं आणलं होतं. मिशीच्या जागी पेन्सिलने रेष काढली होती. कॉलेजमधे नंतर पुरूषोत्तम करंडक वगैरे केलं पण स्टेजमागच्या खोलीत मेक-अप करताना छातीचे ठोके आपसूक वाढण्याचा पहिला अनुभव म्हणजे ते मावळ्याचं स्वगत !

स्टेजवर गेल्यावर समोर बसलेले असंख्य चेहरे बघून पहिले काही सेकंद बोबडीच वळली ! सगळ्या चेहऱ्यांचा मिळून एक मोठ्ठा चेहरा समोरच्या अंधारातून आपल्याकडे बघतोय असं वाटायला लागलं !! शरीराचा तोल एका पायावरून दुस़ऱ्या पायावर अशी अस्वस्थ चुळबूळ सुरू झाली, छातीचे ठोके माईकमधून सगळ्यांना ऐकू जातायत असं वाटायला लागलं, दोन्ही हाताच्या तळव्यांना दरदरून घाम..! भरीत भर म्हणून, पाठांतराच्या कप्प्यावर, मेंदूनं विस्मृतीचं आवरण घालून ठेवलं !! थोडक्यात म्हणजे फजितीची पूर्वतयारी झाली होती !!

अस्वस्थपणे भिरभिरत्या नजरेला विंगमधल्या पानसेबाई दिसल्या. त्यांच्यातल्या आजीने नेहमीचं, ओळखीचं स्मित दिलं. त्या नजरेतल्या विश्वासाने धीर दिला, हुरूप वाढला !! हिंदी सिनेमात कसं… मारामारी संपली की पाऊस थांबतो आणि स्वच्छ ऊन पडतं ना तसं काहीतरी डोक्यात झालं. समोर कुणीच दिसेनासं झालं आणि मोकळ्या जागेत शाळेतल्या खुर्चीवर बसून पानसेबाई नेहमीसारख्या भाषणाची तयारी करून घेतायत असं वाटलं. “आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो” हे भाषण सुरू करण्याआधीचे शब्द आठवले !(एकदम टिपीकल शाळकरी बरं का !!) त्यानंतर साधारण पाच मिनिटे माझ्यपुरतं घड्याळ थांबलं होतं..आपण काहीतरी बोलतोय एवढंच जाणवत होतं. मग आठवतोय तो एकदम टाळ्यांचा आवाज आणि पाठीवरून फिरणारा पानसेबाईंचा हात ! नेहमीसारखाच… आश्वासक नि अभिमानपूर्वक !! ‘भीड चेपणं’ किंवा ‘स्टेज फ्राईट जाणं’ ज्याला म्हणतात ना ते त्या दिवशी घडलं !

पुढच्या वर्षी चौथीत गेल्यावर शिक्षिका बदलल्या आणि पाचवीपासून तर माध्यमिक शाळा झाली. नंतर कधीतरी पानसेबाई जाता-येताना भेटायच्या पण मग त्या निवृत्तही झाल्या.

नवीन दिवस उगवताना जुने दिवस मावळत असतात. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ हा विचार खूपदा मनात यायचा पण त्याचा आचार कधी झालाच नाही. ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ ! कॉलेज, मित्र-मैत्रिणी, करियरची तयारी, नोकरी … ठराविक टप्यांप्रमाणे वेग घेत गाडी चालू राहिली. एखाद्या स्टेशनवर घटकाभर थांबून पानसेबाईंची विचारपूस राहूनच गेली. काही वर्षांपूर्वी समजलं पानसेबाई गेल्या ! देवासारख्या आल्या होत्या, त्याच्याकडेच परत गेल्या !! मनातली बोच अजून तीव्र झाली !!

असं म्हणतात युधिष्टिराला यक्षाने विचारलं होतं की मनुष्याच्या जीवनातली सगळ्या विचित्र गोष्ट कुठली? युधिष्टिर म्हणाला की आपण एक ना एक दिवस मरणार हे माहित असूनही मनुष्य असा वागतो की जणू तो अमर आहे. गोष्ट अशीच काही आहे ना? चूकभूल घ्यावी पण मतितार्थ तोच. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ ह्यातलं ‘एकदा’ कधीतरी जमवायलाच हवं होतं.

एक वर्ष.. फक्त एकच वर्ष पानसेबाई मला शिकवायला होत्या पण काय देऊन गेल्या ते सांगता येत नाही ! बकुळफुलं ओंजळीत कितीवेळ होती ते महत्वाचं नसतं… मनात सुगंध दरवळतच राहतो !!!
---
गुरुपौर्णिमा - २००८
---

Friday, June 27, 2008

लग्नाआधी नि लग्नानंतर

'शादी से पहले और शादी के बाद' ह्या माझ्या हिंदी कवितेचा अनुवाद !!!
मूळ हिंदी कविता ह्याच ब्लॉगवर वाचता येईल.
--------------------------------------------------------------------
लग्नाआधी हाती हात
शब्दांमधे मधुर मिठास
फोनवर बोलणं तासनतास
भेटल्यावरही रोजचं खास …१

आकाशीचा रंग निळा
वा असो घनघोर वर्षा
कप कॉफीचा छोटासा
दोन जीवांना हो पुरेसा….२

लग्न होता सारे संपले
तिचे ‘ना’ केवळ नाव बदले
संध्याकाळी येतो घरी मी
घेऊनिया भाजीचे ओझे …३

एकांती मग बोलतो अजूनि
ना वेळेचा हिशोब ठेवूनि
घरखर्च नि ‘फी’ पोरांची
जमा संपते चुटकीसरशी …४

मात्र आटलं प्रेम नाही
पण सांगाया वेळ नाही
करता संवाद नजरेतूनी
फुका शब्दांचा खेळ नाही …५

Saturday, June 14, 2008

सिंहासन

‘सिंहासन’ मी दहावीच्या बोर्डाची परीक्षा चालू असताना पहिल्यांदा पाहिलाय !

विजय तेंडुलकर गेले आणि ‘सिंहासन’ आठवला. “…..तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर मी जोड्यानं मारीन !” हे म्हणणारा डिकास्टा आठवला !!

पाठोपाठ आठवायला लागले -- ‘तें’च्या क्लासिक्समधले प्रसंग. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘अर्धसत्य’मधले प्रसंग !! ‘घाशीराम कोतवाल’ मधले प्रसंग !!!

खरंतर ‘सामना’, ‘सिंहासन’ पहिल्यांदा झळकले तेव्हा मी खूप लहान होतो. ‘घाशीराम…’ पहिल्यांदा रंगमंचावर आले तेव्हा तर दोनेक वर्षांचाच होतो. आठवी-नववीत असताना ह्या कलाकृतींबद्दल इतकं ऐकलं होतं की कधी एकदा त्या पाहतो असं झालं होतं.

साधारण पंचाऐंशी – शहाऐंशीच्या सुमारास, शुक्रवारी रात्री उशीरा, दूरदर्शनवर अचानक ‘सामना’ बघायला मिळाला. त्या दिवसापासून “ह्या टोपीखाली दडलंय काय…” आणि ‘सख्या रे! घायाळ मी हरिणी” ही गाणी मनात जागा करून राहिलीयत. डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले ह्यांच्या जुगलबंदीबद्दल काय बोलायचं? आणि काय बोलायचं, “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…’बद्दल !!! भास्कर चंदावरकर म्हणजे अप्रतिम संगीत हे समीकरणही मनात तेव्हाच रजिस्टर झालं. (पुढे ‘थोडासा रूमानी हो जाऍं’ आणि ’घाशीराम कोतवाल’ पाहिल्यानंतर ते समीकरण एकदम पक्कं झालं)

त्यामानाने ‘घाशीराम कोतवाल’ खूप उशीरा पहायला मिळालं. आत्ता चार-पाच वर्षांपूर्वी कधीतरी डीव्हीडी मिळाली. दीपा भारतात गेली होती त्यामुळे घरी एकटाच होतो. एका वीकांतला शांतपणे ‘घाशीराम…’ पहायला बसलो. ‘नाटक असं असतं?’ ‘नाटक असंही असतं??’ ‘असू शकतं???’ घाशीराम म्हणजे एक ‘हलवणारा’ अनुभव होता. तरी आमची पिढी दुर्दैवी कारण आम्हाला डॉ. मोहन आगाशेंचा ‘नाना फडणवीस’ बघता आला नाही.

मगाशी म्हणल्याप्रमाणे ‘सिंहासन’ दहावीची परीक्षा चालू असताना पाहिलाय. मोठा झाल्यावर सिंहासनची व्हिडीयो कॅसेट घेतली पण मी दहावीत असताना आजच्याइतक्या सर्रास डीव्हीडी किंवा व्हिडीयो कॅसेट मिळायच्या नाहीत. रविवारी दुपारी टीव्हीवर ‘सिंहासन’ होता. अनायसे सोमवारी रंगपंचमीमुळे पेपर नव्हता आणि मंगळवारी हिंदीचा(च) पेपर होता. त्यामुळे बिनधास्तपणे ‘सिंहासन’ पाहिला. (गणित किंवा जीव-भौतिक-रसायनपैकी एखादा त्रस्त समंध असता तर ‘सिंहासन’ डळमळलं असतं! तिथे तर हमखास ‘ईशान अवस्थी’ व्हायचा !! प्रश्न दिसायचे पण समजायचे नाहीत !!!)

‘सिंहासन’चा विचार करताना आधी अरूण साधूंचा विचार करावाच लागतो. त्यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ ह्या दोन कादंबऱ्यांततील निवडक प्रसंगांवर आधारित -- सिंहासन ! मराठी सिनेमांत मग ‘वजीर’, ‘सरकारनामा’ असे राजकीय पार्श्वभूमीचे चित्रपट आले पण ‘सिंहासन’ची सर कुणालाच नव्हती. (जशी हिंदीत ‘शोले’ची सर सुभाष घईंच्या ‘कर्मा’ला नव्हती !)

‘सिंहासन’, ’शोले’ आणि ’गॉडफादर’ ह्या सिनेमांत पुन्हा-पुन्हा बघण्यासारखं काय आहे ह्याचं उत्तर देता येत नाही. तुम्ही एकतर ह्या मूव्हीज परत-परत बघता किंवा तो प्रश्न विचारता. ज्या दिवशी तुमचं तुम्हाला सापडतं की परत परत बघण्यासारखं काय आहे, त्यादिवशी तुमचा प्रश्न बंद होतो.

एकतर ‘सिंहासन’ मधे खूप पात्रं आहेत. त्यात सिनेमा इतका वेगवान आहे की पहिल्यांदा बघताना थोडा त्रयस्थपणे बघताच येत नाही. म्हणजे असं समजा की तुम्ही, एकामागोमाग एक चाली रचून चाललेला, बुद्धिबळाचा डाव बघताय. तुमच्याही नकळत तुम्ही त्यात ओढले जाता. त्रयस्थपणे चाली समजून घेऊन त्यांचं विश्लेषण करणं जमत नाही. ‘सिंहासन’ बघताना एक्झॅक्टली असंच होतं.
तुम्हाला काय वाटतं? …… द्या टाळी !

सिनेमात महत्वाची पात्रं चार – शिंदे, दाभाडे, डिकास्टा आणि दिगू टिपणीस. असं ऐकलं होतं की डिकास्टा हे कॅरॅक्टर त्याकाळचे ‘संपसम्राट’ जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्यावर बेतलेलं होतं.

सिनेमाच्या सुरूवातीला मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे ह्यांना एक निनावी फोन येतो … त्यांच्याविरूद्ध कट शिजतोय असं सांगणारा !! त्यानंतर डोक्यात ठोके पडल्यागत पार्श्वसंगीत सुरू होतं आणि मग सुरू होतं -- मुख्यमंत्री शिंदे, अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे, कामगार लीडर डिकास्टा, स्मगलर्स आणि पर्यायाने इतर सगळ्यांचंच…एकमेकांवर कुरघोडी करू पाहणारं राजकारण -- सिंहासन! ह्या सगळ्याचा साक्षीदार म्हणजे पत्रकार दिगू टिपणीस ! जसजसा सिनेमा पुढे सरकतो तसतसे आपणही त्या दिगूसारखेच एका गर्तेत ओढले जातोय असं वाटतं !!



त्यात सुरेश भटांच्या हादरवणाऱ्या ओळी –

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !!!

ब्लॅक एँड व्हाईट सिनेमाची एक वेगळीच जादू असते. जब्बार पटेलनं दिग्दर्शक म्हणून नुसती धमाल उडवून दिलीय ! त्यात अभिनयाच्या बाजूचे दिग्गज -- निळू फुले (दिगू टिपणीस), अरूण सरनाईक (मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे), डॉ. श्रीराम लागू (अर्थमंत्री अप्पासाहेब तथा विश्वासराव दाभाडे), दत्ता भट (शेतकीमंत्री माणिकराव पाटील), सतीष दुभाषी (कामगार पुढारी डिकास्टा), मधुकर तोरडमल (दत्ताजी), श्रीकांत मोघे (आनंदराव), माधव वाटवे (विधानसभेचे सभापती नाना गुप्ते), डॉ. मोहन आगाशे (बुधाजीराव), लालन सारंग (मिसेस. चंद्रापुरे) !!! जोडीला तेव्हाचे नवखे पण नंतरचे दिग्गज नाना पाटेकर (स्मगलर शेठचा हस्तक), रिमा लागू (अर्थमंत्र्यांची सून) !! अगदी न्हाव्याच्या छोट्या भूमिकेत राजा मयेकरांनीही बहार आणलीय !! ‘सिंहासन’मधे ‘पानिटकर’ साकारणाऱ्या जयराम हर्डीकरचा अकाली मृत्यू झाला नसता तर ….!

खरंतर ‘सिंहासन’ हा समान आवडीचे मित्र / मैत्रिणी जमवून एकत्र बघावा असा प्रकार आहे पण ‘दुधाची तहान ताकावर…’ म्हणून इथे काही निवडक संवाद दिल्याशिवाय राहवत नाहीये.
-------------
रावसाहेब टोपले: (फोनवर बोलताना) शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय …इंडस्ट्रीवल्यांना झुकतं माप मिळतंय…सेझचा प्रश्न आहे…आता काय पाईंट आहे? … स्थैर्य पायजे…
-------------
विश्वासराव दाभाडे: मुख्यमंत्र्यांच्याविषयी तुझं काय मत आहे?
डिकास्टा: डॅंबिस माणूस आहे ….. पण माझं तुमच्याबद्दलही तेच मत आहे !
o डावं-उजवं करणं अवघड आहे …तुम्ही दोघंही सारखेच डॅंबिस आहात
o काही मागण्या कागदावर लिहिता येत नाहीत. पण म्हणून जर का त्या पूर्ण झाल्या नाहीत ....तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर मी जोड्यानं मारीन.
-------------
(उस्मानच्या घरी जेवताना पार्श्वसंगीतात गझल चालू आहे)
विश्वासराव दाभाडे: (टेपरेकॉर्डरकडे इशारा करून) हे मेहंदी हसन का?
उस्मान: नाही, गुलाम अली.
विश्वासराव दाभाडे: हां .. तेच ते (आवाज आणि नजरेत एक सहज बेफिकिरपणा)
-------------
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: कुठल्याही परिस्थितीत मला औद्योगिक बाजूला शांतता हवीय. नाईलाजाने मला तुला उचलावं लागेल.
डिकास्टा: आरोप कुठला ठेवणार?
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: तुझ्या सार्वजनिक जीवनात काहीही सापडेल. माणूस चोवीस तास डोळ्यात तेल घालून जगत नाही.
-------------
पक्षाध्यक्ष: च्यामायला ….. पक्षाध्यक्ष म्हणजे शेरडीच्या शेपटासारखं ! माश्या धड मारता येत नाहीत, अब्रू धड झाकता येत नाही !!
-------------
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: (कमालीच्या दांभिकपणे) राजकारण हे असं असणार माहिती असतं तर इथवर आलोच नसतो. देवाच्या आळंदीला निघालो आणि पोचलो चोराच्या आळंदीला !
-------------
शेवटी हा लेख पूर्ण करण्याआधी एकच संवाद जो एक चिरंतन सत्य सांगतो.
न्हावी: ह्या वेळी दाभाडे नक्की मुख्यमंत्री होणार.
दिगू टिपणीस: शिंदे आले काय आणि दाभाडे आले काय …तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?
-------------

Sunday, May 11, 2008

डिच !

“खबरदार जर पुन्हा डिचकडे गेलास तर !”

हे वाक्य ऐकणारा विद्यार्थी आणि ऐकवणारे शिक्षक वेगळे असायचे पण डिच तशीच होती … वर्षानुवर्षे !

आमच्या शाळेचं मैदान खूप खूप म्हणजे खूपच मोठं आहे. आता मोठं म्हणजे किती तर मधल्या सुट्टीत जर मैदानाच्या दुसऱ्या टोकाला गेलो तर सुट्टी संपल्याची घंटा ऐकूच यायची नाही … इतकं मोठं !! Football, Hockey, Volleyball, Basketball, खो-खो, कबड्डी, लांब उडी, उंच उडी, full size athletics track, Rifle shooting range, पाच-सातशे सायकलींचा स्टॅंड, पाण्याची गोल टाकी हे सगळे आहेच पण त्याशिवाय एकावेळी किमान दोन टीम्स क्रिकेट खेळू शकतील इतकी मोकळी जागा ! त्याशिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि जिम्नॅस्टिक्सचा हॉल वेगळेच ! हे सगळं .. डिचने व्यापलेली जागा सोडून !!!

अरे हो .. पण ही ’डिच’ काय भानगड आहे ते सांगायचेच राहिले. अर्थात जे कोणी आमच्या शाळेत, म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ - गुलटेकडी, पुणे इथे शिकले..निदान साधारण एकोणीसशे नव्वदच्या मध्यापर्यंत – त्यांना डिच म्हणजे काय ते सांगायलाच नको पण इतरांठी थोडी माहिती सांगायला हवी.

तर डिच म्हणजे – अगदी सोप्या भाषेत म्हणजे -- मैदानामधे असलेला एक मोठ्ठाच्या मोठ्ठा खड्डा! त्या डिचला प्रदक्षिणा घालायची तर शाळेतल्या मुलांना साधारण दहा-एक मिनिटे लागायची; त्यावरून डिचच्या परीघाचा अंदाज यावा !

काय होतं त्या डिचमधे ? खरं तर प्रश्न असा हवा की काय नव्हतं त्या डिचमधे ? !! झाडी-झुडुपं, डिचमधे उतरत्या जमिनीच्या एका कडेला बांबूचं छोटं रान, डिचच्या मध्यभागी पाणी, त्यात पुरूषभर उंचीचं गवत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पाण्यात मधोमध दलदल आणि खूपसं ऍसिड !!!

तरतऱ्हेचे पक्षी, पाणकोंबड्या आणि खारी तर होत्याच पण कधी कधी सापही दिसायचे ! काहीजण तर शपथेवर सांगायचे की त्यांनी डिचमधे अजगर पाहिला ! खरं-खोटं काय ते फक्त छातीठोकपणे सांगणारी मुलं, देव आणि असलाच तर तो अजगरच जाणे !

दिवसा काही विशेष नाही पण संध्याकाळ व्हायला लागली की डिच अजूनच गहिरी आणि भीतीदायकही वाटायची. ते संदीप खरेचं ‘खतरनाक’ बालगीत ऐकलयंत – बुंबुंबा म्हणून ! त्याने लिहिलंय ’आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून, पडका वाडा बसला आहे दबा धरून!’ तर त्यातच पुढे पडक्या वाड्यामागच्या विहिरीचं वर्णन करताना त्याने लिहिलंय ’कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी… उच्चारावे जसे अघोरी मंत्र कुणी, दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ .. काठावरती येऊन बसते संध्याकाळ!’ ह्या ओळी वाचताना जशी भीती वाटते ना तशीच आम्हाला संध्याकाळी डिचकडे बघताना यायची.

बाकी सगळ्यापेक्षा मुलांना खरी भीती वाटायची ती दलदलीची. हो ना, क्रिकेट खेळताना जर बॉल तिकडे गेला तर बॉल पाण्यात असेपर्यंत काठ्या वगैरे वापरून आम्ही तो काढायचो पण एकदा तो पुढे दलदलीत गेला की मी मी म्हणणारे हरायचे !!! कधी कधी तर चक्क आम्ही ३-४ मुलं एकमेकांच्या कंबरेला धरून साखळी करत असू की उगाच बॉल काढणारा मुलगा दलदलीत पडला पडायला नको.

समाजसेवेचा कॅंप असला की दोन दिवस शाळेतच मुक्काम असायचा पण संध्याकाळनंतर डिचकडे फिरकायची अजीबातच परवानगी नसायची. पोरांच्या पैजा लागायच्या की सगळ्यांची नजर चुकवून रात्री पटकन डिचमधे उतरून लगेच परत यायचं पहिली गोष्ट म्हणजे सहसा कोणी अशी पैज कबूल करत नसे आणि केलीच तरी जिंकण्यासाठी फारसे कष्ट करत नसे.

हे असं असलं तरी डिच म्हणजे आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य होतं. डिचच्या काठावर पिंपळ आणि निलगिरीची झाडं होती. त्या झाडांच्या थंडगार सावलीत बसून एकमेकांची चेष्टामस्करी करणं, खोड्या करणं आणि कधीकधी चक्क अभ्यासही करणं ह्याची मजा शब्दांत पकडू म्हणता पकडता येत नाही.

सकाळी साधारण दहाच्या सुमारास मधली सुट्टी व्हायची. बांबूच्या शांत आडोशाला बसायला खूप छान वाटायचं. कधी अचानक एखादा off period मिळायचा. तेव्हा तर त्या बांबूच्या वनात झडलेल्या गप्पांच्या मैफिली काय वर्णाव्या महाराजा? एकमेकांना सिनेमाची स्टोरी सांगायला खूप धमाल यायची. हिंदी सिनेमाचा प्रभावामुळे असेल पण आम्ही पोरं त्या जागेला ’अड्डा’ म्हणायचो.

डिचच्या काठावरल्या पिंपळाच्या पानांची सळसळ आम्ही फक्त पुस्तकातच वाचली नव्हती, तर रोज ती पहायचो. पिंपळपानांपैकी अखंड पानं पुस्तकांमधे ठेवून वाळवायची. ती वाळली की त्यांची छान तलमदार जाळी व्हायची. हातावर चुरगळलेल्या निलगिरीच्या पानांचा सुगंध तर अजूनही मनात ताजा आहे.

डिचच्या उतरत्या काठाला घसरगुंडी करून बरोबर पाण्याच्या काठाशी थांबायचं आणि युनिफ़ॉर्मची पॅंट फाटू द्यायची नाही. कितीतरी मुलांबरोबर मीसुद्धा हे कसब् तिथेच शिकलो. त्या सगळ्या झाडांमधून, डिचच्या काठावरून, त्या घसरगुंडीवरून, पाण्यात न पडता सूर-पारंब्या खेळताना वेळ कसा जायचा ते कळायचंही नाही.

आम्हा पोरांचा अजून एक खेळ आवडता होता. तीन-चार मुलं एकत्र असलो की डिचमधे उतरायचं आणि पाण्याच्या काठी मस्तपैकी मांडी घालून निवांत बसायचं. मग आसपासच्या दगडांपैकी त्यातल्या त्यात चपटे दगड घ्यायचे. एकेकाने पाण्यात ते चपटे दगड असे मारायचे की दगडांनी पाण्यावर २-३ टप्पे घेत गेलं पाहिजे ! ज्याचा दगड जास्तीत जास्त टप्पे घेईल तो त्या दिवशीचा winner !!

कधीकधी नशीब जोरदार असलं तर तीन-चार महिन्यात सायकलचं टायर पंक्चर व्हायचं नाही. मग पंक्चरसाठी लागले तर असू दे म्हणून खिशात ठेवायला मिळालेले पैसे सत्कारणी लागायचे. शाळेच्या कॅंटीनमधून आम्ही पोरं वडा-पाव घ्यायचो आणि बांबूच्या वनात निवांत बसून खायचो. सटीसहामही कधीतरी होणारी ती चैन असायची त्यामुळे त्याची मजाही वेगळीच होती. आताही मधेच कधीतरी वाटतं की काही तासांसाठी लहान व्हावं, यार-भिडू जमवावेत आणि डिचमधे उतरून वडा-पावची पार्टी करावी !!!

काही वर्षांपूर्वी कधीतरी समजलं की शाळेने भराव वगैरे घालून डिच पूर्णपणे बुजवलीय ! वाईट वाटलं; खरंच सांगतो खूप वाईट वाटलं। पहिलं कारण म्हणजे आमच्या शाळकरी आठवणींतला एक खूप मोठा भाग आता परत कधीच बघता येणार नव्हता. दुसरं म्हणजे आता शाळॆत शिकणाऱ्या मुलांना डिचचा आनंद कधीच मिळणार नाही.

शाळेत असताना समजलं नाही पण वर्गात जसं शिकलो तसंच चार भिंतींबाहेरही खूप गोष्टी शिकलो. खूप गोष्टी तर शिकलो डिचमधे किंवा डिचकडूनही !! अगदीच काही नाही तर ’खड्ड्यात जाणं’ ह्याला इंग्लिशमधे ’to be ditched’ असं का म्हणतात, ते मराठी शाळेत शिकूनही खूप लवकर समजलं होतं !!!

Sunday, April 13, 2008

स्वप्नातलं गाव …

स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

समुद्री गाज, पोफळी बाग
कलती उन्हं सोनेरी झाक
सोनेरी वाळूत हिरवा पडाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

कौलारू घर, दारी झुलाव
पाण्यात दूर डोलतेय नाव
ताजी म्हावरं पैशाला पाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

लाकडी घर, टेकडीवर गाव
उतरतं छत .. काचेचा ताव
गुलाबी थंडी धवल वर्षाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

न्हाली दव, ऊबदार सकाळ
नेसूनि रंग ये….संध्याकाळ
चंदेरी उधळण चांदण्या वाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

जगती कोण, चुकला धाव?
मनी आपलं.. एक जपावं गाव
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

Saturday, March 29, 2008

सेहवागचं काय करायचं ?

कसोटी क्रिकेटमधे ३०० धावा .. त्याही फक्त २७८ चेंडूत ! शिवाय एकदा ३०० केल्या आहेतच !

द. आफ्रिकेचे खेळाडू एकच प्रश्न स्वत:ला विचारत असतील – “त्या सेहवागचं काय करायचं?”

सेहवागने मला खोटं ठरवलं आणि मला मनापासून आनंद झालाय !! चमकलात? सोप्पंय हो .. सेहवाग जेव्हा नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागला होता तेव्हा मला वाटायचं की ह्याचं तंत्र के. श्रीकांतपेक्षा बरं आहे बस्स ! बेभरवशेपणात मात्र एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं ! दोन त्रिशतकं आणि कसोटी क्रिकेटमधे, वन डे क्रिकेटपेक्षा, जास्त सरासरी राखून Sehwag proved me wrong !

त्याने काल होळीच्या मोसमात जी दिवाळी साजरी केलीय ना त्याची फक्त एक झलक इथे आहे !

त्याच्या खेळातल्या बेभरवशेपणाचं तर असं आहे की तो त्याच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे ! कुठल्याही परिस्थितीत जर चेंडू फटका मारण्यायोग्य वाटला तर तो फटकावणारच ! बरं, जाफर किंवा द्रविडला जो चेंडू ‘well left’ सदरात जावा असं वाटेल त्यावर सेहवागला ‘sixer’ दिसू शकतेच ! त्याला इलाज नाही ! जो माणूस ३०० धावांच्या जवळ पोचल्यावरही सिक्सर मारण्यासाठी पुढे यायला कचरत नाही त्याला कोण आणि कसं अडवणार ? कसोटीत ३०० धावा करणारा तो एकमेव भारतीय आहे तरीही तीनशे दिसायला लागल्या म्हणून तो मंदावला नाही ! उलट त्याचा प्रयत्न असा दिसतो की शतक, द्विशतक, त्रिशतक हे टप्पे शक्यतो चौकार – षटकार असे रूबाबात पार करायचे ! त्याला ‘नजफगढचा नवाब’ म्हणतात ते का उगाच?

तो खेळताना आपण उत्सुक अधीरतेने सामना पहायचा ! बाकी कुणी काही करू शकत नाही – अगदी नॉन स्ट्राइकर एंडचा खेळाडूही ! षटकार बसला तर आपली प्रार्थना फळाला आली म्हणायचं पण आऊट झाला तर नाही रूसायचं !

मर्चंट, गावसकर आणि तेंडुलकर निर्विवादपणे महान खेळाडू आहेत पण त्यांनीही जो पराक्रम केला नाही तो सेहवागने करून दाखवलाय ! एकदा नाही तर दोनदा !! ‘तेंडल्या’ अजून क्रिकेट खेळतोय .. त्यामुळे आशेला वाव आहे !!!

सेहवागचा खेळ त्याच्या सळसळत्या रक्ताचा आरसा असावा ! नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मायकेल क्लार्क सचिनला म्हणाला होता की आता म्हातारा झालास, तुला तर नीट पळताही येत नाही वगैरे ! (सचिन international cricket खेळायला लागला तेव्हा मायकेल क्लार्क ८-९ वर्षांचा असेल! )त्यावर non striker सेहवागने ताडकन मायकेल क्लार्कला सुनावलं होतं की तुला माहितीये ना तू कोणाशी बोलतोयस? अरे, तो ‘सचिन तेंडुलकर’ आहे !!

सेहवागचा एक अनोखा विक्रम म्हणजे त्याने गेल्या दहा शतकांपैकी प्रत्येक खेळीत किमान दीडशे धावा ठोकल्यात. टेस्ट क्रिकेटमधे हे करणारा तो एकमेव खेळाडू आहे. लक्षात घ्या, इथे एकमेव खेळाडू म्हटलंय; एकमेव भारतीय खेळाडू नाही ! त्याची धावांची भूक अशीच वाढत राहो !!!

अशा खेळी झाल्या की जाणवतं टेस्ट क्रिकेटला इतकं महत्व का आहे ते ! हा खेळ मानसिक आणि शारीरिक कणखरपणा पाहणारा आहे. त्यासमोर T20 म्हणजे अगदीच लुटुपुटीचं क्रिकेट वाटतं ! काल ३०० धावांच्या जवळ पोचल्यावरही सेहवाग एकेरी – दुहेरी धावा घ्यायला उत्सुक होता !

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने योग्य वेळी दाखवलेला संयम ! डावखुरा फिरकी गोलंदाज पॉल हॅरिस सातत्याने लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत होता. अशा नकारात्मक गोलंदाजीचा उद्देश हाच असतो की बॉल्स नुसते वाया जातात, विकेट मिळत नाही पण बॅट्समन फटकेही मारू शकत नाही ! सेहवागसारखे फटकेबाज तर लवकर फ़्रस्ट्रेट होऊन चूक करण्याची शक्यता निर्माण होते. काल वीरू त्याला पुरून उरला. शांत डोक्याने चेंडू सोडून द्यायचा पण योग्य संधी मिळवून चेंडू भिरकवायचा ! अगदी ठरवून मारल्यासारखे रिव्हर्स स्वीपही बिनधास्त मारत होता !

कुठलाही खेळ, मग अगदी पत्ते असोत की कुस्ती, युक्तीने खेळायचा असतो. ‘चक दे इंडिया’ आठवा ! जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या अक्कलहुशारीवर कुरघोडी करावी लागते ! द.अफ्रिकेचे खेळाडू म्हणजे पक्के व्यावसायिक पण काल वीरूने ‘चक दे..’तला धडा जणू तोंडपाठ म्हणून दाखवला !!!

Sunday, March 9, 2008

साहेबलोक !

‘पोटासाठी दाही दिशा, फिरवीशी तू जगदीशा’ !

‘नोकरीठेप’ भोगत, देश-विदेश फिरताना, तरतऱ्हेचे ‘मॅनेजर’ भेटतात / दिसतात. कधी आपले मॅनेजर म्हणून, कधी दुसऱ्या टीमचे मॅनेजर म्हणून, कधी आपल्या मित्र/मैत्रिणींचे मॅनेजर म्हणून तर कधी टी.व्ही, वृत्तपत्रे अशा मिडीयांतील बातम्यांमधून! आपल्या सुदैवाने बरेचजण चांगले असतात पण काही नमुनेही भेटतात !! काहीजण तर नमुनेदार असले तरी मॅनेजर म्हणून चांगले असतात !

तर, ही आहे ‘साहेबलोकांची’ एक ’मिष्किल’ झलक ! थोडं हसायचं आणि सोडून द्यायचं !

गंभीरराव
आपण interview देतानाच अंदाज येतो. ह्यांचा चेहरा अतिशय गंभीर आणि आपल्यावर डोळे रोखून बघायची सवय. बरं, चेहरा इतका निर्विकार की आपल्याला वाटत राहतं, “च्यायल्ला ! काहीतरी झोल आहे..उत्तर चुकलं बहुतेक !” काम करतानाही तेच. सकाळी ‘गुड मॉर्निंग’ म्हणतात पण चेहरा सांगतो की त्यांना जणू म्हणायचंय, “ आलास? आता बस आणि न बोलता जरा काम कर !” आपल्या टीमला award मिळालं तरी हे गंभीर आणि कंपनीत lay off असले की मग तर अगदी धीरगंभीर !

चिंतोपंत
‘चिंता करतो विश्वाची’ असं म्हणण्याची स्फूर्ती समर्थांना ह्यांच्याचसारख्या कोणाकडे तरी पाहून आली असणार ! ह्या जातीचा साहेब सदोदित चिंतातूर चेहरा ( आणि डोळ्यांत भिजलेल्या सशाचे भाव) घेऊन वावरतो. आता चिंता म्हणलं की ती कशाची आहे ते तरी कळायला नको का? आत्ता project deadline जवळ येतेय म्हणून tension असेल तर पाच मिनिटांत त्यांच्या डोक्यांत भुंगा येतो, “आज तरी घरी गेल्यावर बायकोचा मूड बरा असेल का?” ‘To act like being lost at sea’ हा वाकप्रचार चिंतोपंतांना एकदम लागू पडतो ! ‘राशीचक्र’ मधे शरद उपाध्ये म्हणतात तसं हे मॅनेजर बहुतेक ‘कन्या’ राशीचे असावेत!

गोंधळेकर
‘चिंतोपंत’ जर कन्या राशीचे असतील तर ‘गोंधळेकर’ बहुतेक ‘मीन’ राशीचे असावेत ! म्हणजे असं की कामाला सुरूवात वगैरे झोकात होते, बोलणं एकदम polished पण मधेच कुठेतरी माशी शिंकते आणि सगळं planning गडगडतं! Conference room मधे मस्तपैकी प्रेझेंटेशन सुरू करायला घेतात आणि शेवटच्या क्षणी लक्षात येतं की पाच नंबरनंतर एकदम सात संबरची स्लाईड आहे. मधली एक स्लाईड गायब ! एकदम धावपळ करतात, शोधाशोध करतात, ब्लड प्रेशर वाढतं आणि मग अचानक ट्यूब पेटते की स्लाईड हरवली नाहीये फक्त slides numbering चुकलं आहे ! साधं कॉफी पीत असताना, जरा स्टाईलीत बसावं म्हणून, थोडं तिरकं बसायला जातात; त्यांच्या धक्क्याने टेबलवरच्या दोन फाईल्स जमिनीवर पडतात आणि आपल्याबरोबर कॉफीचा कपही नेतात…भरलेला !

संस्कृतपंडित
“What the XXXX is this?” !!! ऐकलंयत का कधी? तर, ह्या साहेबांकडे ‘असा’ शब्दसंग्रह भरपूर असतो. एकदा सरबत्ती सुरू झाली की शक्यतो शिवी repeat होत नाही. स्वत:च्या हाताखालचे लोक आणि peers अशा सगळ्या लोकांना कस्पटासमान लेखणं त्यांना छान जमतं. त्यांची जीभ म्यान होते फक्त त्यांचा मॅनेजर आणि त्याच्यावरच्या लोकांसमोर ! शिवाय एकदा शिव्या सुरू झाल्या की मग भाषेचं बंधन नसतं. हिंदी, Enlish, मराठी, फ्रेंच, हाताच्या खुणा (!) सबकुछ चलता है !

गुरुदेव
‘न धरी मी शस्त्र करि, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार !” योगेश्वर कृष्णाचं वाक्यं हे लोक जणू ‘आदेश’ म्हणून पाळतात ! आपल्या software program मधल्या चुका शोधायच्या असतील तर आपल्या बाजूला बसतात आणि,”ही लाईन इकडे का टाकलीय?”, “हा counter कुठे reset करतोयस?”, “अरे सापडलं! तू flag टाकलाच नाहीयेस” वगैरे ‘मौलिक मार्गदर्शन’ करतात. Coaching and Mentoring हे त्यांचे आवडते शब्द ! वागणं-बोलणं, देहबोली म्हणजे जणू एकदम प्रोफेसरची ! आपला कुठलाही प्रॉब्लेम शांतपणे ऐकून घेणार, तेही अशा पोझमधे की एका हाताची घडी, त्यावर दुसऱ्या हाताची अर्धी घडी आणि त्या हाताचा तळवा स्वत:च्या गालावर ठेवलेला, खुर्चीत मागे रेलून बसलेले वगैरे! म्हटलं ना मगाशी की देहबोली एकदम प्रोफेसरसारखी असते म्हणून !

ढकलेश्वर
‘Passing the parcel’ हा खेळ खेळण्यात एकदम पटाईत लोक! आपलं काम दुसऱ्यावर ढकलणं ह्यांच्याकडून शिकावं. Project Manager हे पण project plan आणि इतर documents तयार करणार Project Leader ! तो (किंवा ती) तरी काय करणार? ‘Preparing for future growth’ असं स्वत:ला समजावतो (किंवा समजावते) आणि गुमान Microsoft Project वापरून आयोडेक्सचा खप वाढवतो (किंवा वाढवते) ! स्वत:ची सही दुसऱ्या कुणी करून चालत असतं आणि त्याची जबाबदारी मात्र त्या दुसऱ्यावर पडणार असती तर ‘ढकलेश्वरांनी’ नक्की ते कामही ढकललं असतं !

आनंदराव
तुमचं नशीब थोर असलं की असा मॅनेजर मिळतो. हे लोक अगदी आनंदात जगतात आणि मस्तीत राहतात. भाषेबाबत अगदी ‘संस्कृतपंडित’ नसले तरी आपला मित्र असल्यासारखे ‘संस्कृत’ ऐकवतात. त्यांच्याकडे काम करायला इतकी ऊर्जा कुठून येते? सकाळी ८:३० वाजता असलेली चेहऱ्यावरची ताजगी संध्याकाळी ६:३० वाजताही तशीच कशी राहते? कधी-कधी तर रात्री-अपरात्री काम करतानाही हे लोक ताजेतवाने ! जणू नुकतेच आंघोळ करून आलेत. त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे धमाल असते पण नेमके ते नोकरी सोडतात किंवा काही कारणाने तुम्ही नोकरी सोडता.

चुकारेशास्त्री
‘खोटारडा’ आणि ‘थापाड्या’ ह्यांत जसा फरक आहे ना तसाच ‘चुकारेशास्त्री’ आणि ‘ढकलेश्वर’ ह्या दोघांत आहे ! ‘ढकलेश्वर’ तसे निरूपद्रवी असतात; म्हणजे अगदीच गरज पडली तर आपल्या मदतीला येतातही. ‘चुकारेशास्त्री’ त्यांच्या नावाला दोन्ही अर्थांनी जगतात; एक म्हणजे हक्क असल्यासारखी कामं टाळतात आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याच्या चुका दाखवण्यात एकदम तत्पर असतात !

गुलछबू
हे प्रकरण म्हणजे अगदीच वेगळं ! ह्या जातीचे लोक खूप मोठ्या पदांवर, नाटक-सिनेमा-जाहिरात वगैरे क्षेत्रांत किंवा राजकीय पक्षाचे नेते म्हणून दिसतात. ह्यांच्यात ‘आनंदरावांचे’ बरेच गुण असतात पण काही जास्तीचे ‘गुणही उधळतात!’ लग्नं ह्या संस्थेवर फारसा विश्वास नसल्याने किंवा नुसत्या लग्नाने भागत नसल्याने त्यांचं ’इतर रंग खेळणं’ जोरात असतं. ‘स्टेपनी’ फक्त आपल्या वाहनाला असावी ह्यावर त्यांचा विश्वास नसतो !!!

गोंदवाले
तुमची मॅनेजर स्त्री असल्यास हा प्रकार भेटू शकतो. बाईमाणूस मॅनेजर असेल तर सामान्यपणे एक गोष्ट दिसते की आपलं म्हणणं निदान नीट ऐकून घेतलं जातं. एका जागी बसून सलगपणे काम करण्याची क्षमता पुरूषांपेक्षा बायकांमधे जास्त दिसते. एकदा का सकाळी खुर्चीवर मांड ठोकली की मग फक्त लंचसाठी उठायचं. नंतर परत कामाला लागायचं ते एकदम संध्याकाळी घरी जायलाच उठायचं. तोपर्यंत जणू ‘ये फेविकॉल का जोड है !’ कदाचित पुरूषांपेक्षा बायका जास्त सहनशील आणि एकाग्र असल्यामुळे असेल. सहनशीलतेवरून आठवलं, ‘प्रसूतिवेदना’ हा प्रकार पुरूषांना भोगावा लागत नाही त्यामागे निसर्गाचा नक्की काही विचार असणार ! ये बात ‘बाप’ लोगों के बस की नहीं !

फुलबाजी
नमुनेदार स्त्री मॅनेजरचे मुख्य दोन प्रकार दिसतात. शोभेची फुलबाजी आणि तडतडी फुलबाजी ! शोभेची फुलबाजी नुसतीच इकडून-तिकडे करत असते. चेहऱ्यावर छानसं हसू कायम आणि ओठी “प्लीssज”, “थॅंक्यू sss” अशी गोड भाषा ! भाषेइतकाच ओठांवर तजेलदार असतो लिपस्टिकचा रंग ! कसं जमतं त्यांनाच माहिती पण दिवसभर लिपस्टिक तस्संच लाल राहतं ! तडतडी फुलबाजी असेल तर ह्या सगळ्या बरोबर ‘तोंडाचा पट्टा’ हा एक दागिना असतो. एकतर सारखी फोनवर असते किंवा मग status report चा कीस पाडत असते.

मायक्रोस्कोप
ह्यांचा दुसऱ्यावरच काय पण बहुतेक आरशातील स्वत:च्या प्रतिमेवरही विश्वास नसतो ! प्रत्येक गोष्ट अगदी बारीक-सारीक माहिती करून घ्यायची असते. त्यांच्या लेखी ‘manager’ ह्याचा अर्थ ‘controller’ असा होतो ! Programmer मान खाली घालून काम करत असताना, हलक्या पावलांनी, त्याच्या / तिच्या मागे येऊन काय प्रोग्रॅम लिहितायत ह्याकडेच त्यांचं जास्त लक्ष ! पांढ़ऱ्याशुभ्र पूर्ण कागदापेक्षा त्यावरचा छोटा काळा ठिपका ह्यांना आधी दिसतो !

फणस
हे म्हणजे कोकणातल्या फणसासारखे, वरून काटेरी पण आतून एकदम गोड. दुसरी उपमा द्यायची तर करली माश्यांसारखे. खूप काटेरी पण तितकेच चवदार ! खूप काम असेल तर आपण रात्रभर बसलो तरी एका शब्दाने म्हणणार नाहीत पण आपल्या खायची-प्यायची नीट सोय करतील. प्रॉब्लेम आपण सोडवायचा असल्याने, त्यांना खरं विशेष काही करण्यासारखं नसूनही, रात्रभर आपल्यासाठी थांबतील. रागावले की उभं-आडवं झापतील पण आजारी असलो तर चौकशी करायला घरी येतील ! आपण बरे झाल्यावर ऑफिसमधे गेलो की पुन्हा चौकशीही करणार नाहीत !

शिलेदार
‘एक घाव – दोन तुकडे’ असा बाणा, मग भले ते मराठी नसेना! तडकफडक बोलणं आणि फटाफट निर्णय घेणं ह्यांच्याकडून शिकावं. दोन तास चाललेल्या चर्चेच्या गुऱ्हाळात (अर्थात conference call) हे दहा मिनिटांसाठी येतात आणि सगळं मार्गी लावून जातात. जणू घोड्यावरून येतात आणि तलवार पाजळून जातात. ह्या साहेबांचा ‘learning curve’ वगैरे भानगडींवर विश्वास नसतो ! ‘शिलेदार’ आणि ‘संस्कृत पंडित’ असे गुण एका ठिकाणी असले तर काही विचारायचीच सोय नाही.अशावेळी त्यांच्या टीममधे माणसं गरज असेपर्यंत राहतात आणि पहिली संधी मिळाली की बाहेर पडतात. Senior Management मात्र अशा मॅनेजरला गळ्यातला ताईत करते कारण ‘On Schedule - Under Budget’ हा त्यांचा मंत्र असतो.

बुरखाधारी
हे फारच डेंजरस ! ‘मिठी छुरी’ ह्या कॅटेगरीतले ! तुम्हा चार-पाचजणांत एकदम मस्त गप्पा करतील, तुमच्या बरोबर चहा-कॉफी घेतील आणि त्यांच्या स्वत:च्या मॅनेजरची यथेच्छ निंदा करतील. तुमची reaction आणि तुमच्या comments लक्षात ठेवतील. संध्याकाळी त्यांच्या मॅनेजरबरोबर ड्रिंक्स घेतील आणि दिवसभराचा वृत्तांत तिखट-मीठ लावून सांगतील ! ज्या दिवशी तुम्हाला समजतं की आपण सहज काहीतरी बोललेलंसुद्धा भलताच अर्थ घेऊन, माजोबांकडून boomrang होतंय, तेव्हा तुम्ही शहाणे होता. (टीप : बापाचा बाप – आजोबा तसं मॅनेजरचा मॅनेजर – माजोबा !)

रंगेल रिंगमास्टर
डोळ्यांसमोर आणा – हेफ हेफ़नर किंवा फिरोज खान ! अजून काय सांगायला पायजे राव? ‘प्ले बॉय’ मासिकाचा सर्वेसर्वा हेफ़ हेफनर त्याच्या विलासी राहणी आणि रंगील्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षीही साहेब ‘कार्यरत’ आहेत !!! पण कॉर्पोरेट जगात मात्र हेफची अजून एक ओळख आहे; ती म्हणजे अतिशय organized professional ! कधीतरी एकदा टीव्हीवर त्याचं ऑफिस, कामाची पद्धत वगैरे दाखवत होते. सगळं एकदम टापटीप आणि पद्धतशीर. कदाचित त्यामुळेच ‘इतर’ मॅगझिन्स आणि ‘प्ले बॉय’च्या यशात प्रचंड फरक आहे. आपल्याकडेही रूपेरी पडद्यावर मुमताज, झीनत अमान पासून ते सेलिना जेटलीपर्यंत सगळ्यांना ‘दाखवणारा’ फिरोज खान एक दिग्दर्शक म्हणून शिस्तशीर आणि तापट आहे म्हणतात.

अधारस्तंभ
हे म्हणजे फारच दुर्मिळ लोक ! ‘आखूड शिंगी, बहु दुधी’ म्हणता येतील असे.

बिझनेसचं सखोल ज्ञान, नवनवीन टेक्नॉलॉजीची माहिती, जीभेवर मिठ्ठास, ‘आनंदरावांची’ प्रसन्नता, ‘शिलेदारांची’ आक्रमकता, ‘गुरूदेवांचा’ शांतपणा, ‘गोंदवाल्यांची’ एकाग्रता, ‘रिंगमास्टरचा’ पद्धतशीरपणा आणि रसिकता (रंगेलपणा नाही !), ‘मायक्रोस्कोपची’ चिकित्सक वृत्ती, वागण्यात ‘फणसाचा’ गोडवा आणि ‘गोंधळेकरांचा’ सरळ स्वभाव एवंगुणवैशिष्ठे एकत्र केल्यावर हा तयार होतो ! असा मॅनेजर कधी भेटला तर जरूर कळवा !!!

एकमेवाद्वितीय
ही एक आणि ही दुसरी क्लिप पहा. तुम्हीच काय ते ठरवा !!!