Friday, December 18, 2015

स्वर कट्यार….


मैफल संपली आणि सभागृहात एक समाधानी शांतता पसरली! काही क्षण सगळे जण त्या शांततेत स्वतःला सामावून घेत होते. थोड्या वेळाने कुणी कुणी भानावर आले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्यांची संख्या आणि टाळ्यांचा आवाज दोन्ही वाढायला लागले. अर्रे! पण जमलेले सगळे तर चित्रपट बघायला आले होते आणि त्यांना अनुभवायला मिळाली दर्जेदार संगीताची जणू जिवंत मैफल! कान आणि डोळे ह्यांच्या पलीकडे जाऊन, मन आणि बुद्धी ह्यांचे टप्पे पार करून, जीव सुखावणारी मैफल! 'कट्यार काळजात घुसली' हा सिनेमा म्हणजे एक अक्षरश: 'जमलेली' मैफल आहे! 

मुळात 'कट्यार …' हे नाटक असं आहे की काही पिढ्या त्या संगीतावर जोपासल्या गेल्या आहेत. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांनी 'कट्यार…' नाटकाद्वारे जे करून ठेवले आहे ते अनेकांना स्वप्नातही शक्य होत नाही. अशा नाटकाला हात लावून त्याचा सिनेमा करायचा, तोही दोन हजार पंधरा साली, ही कल्पना अशक्यप्राय होती. पण जसं आव्हान असतं तसा आव्हानाला हात घालणारा कुणी असतोच. 'कट्यार…'च्या बाबतीत ते धाडस केलं सुबोध भावेनं! 

'बालगंधर्व' चित्रपट आला तेव्हाच सुबोधने दाखवलं होतं की हे पाणी वेगळं आहे. एकदा ‘दर्जा’ ह्या निकषावर ठाम रहायचं ठरल्यावर कामही तसंच व्हायला लागतं. एका अर्थाने पाहिलं तर 'बालगंधर्व' चित्रपटातील भूमिका ही सुबोधमधल्या विचारी कलावंताची 'कट्यार…'च्या दिशेनं होणारी वाटचाल असावी.  तेव्हा कदाचित सुबोधच्या मनात 'कट्यार….'चा सिनेमा करण्याबद्दल काही नसेलही पण इंग्लिशमध्ये म्हणतात तसं ‘दि डॉटस कनेक्ट लुकिंग बॅक!’ 

'कट्यार….' येणार समजल्यावर पहिली उत्सुकता ही होती की संगीत दिग्दर्शन कोण करणार आणि अर्थातच दुसरी उत्सुकता ही की ख़ाँसाहेब कोण साकारणार?  शंकर-एहसान-लॉय संगीत देणार ऐकल्यावर बऱ्याच भुवया आश्चर्याने वर झाल्या होत्या!  अर्थात शंकर महादेवनचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास आहे आणि ह्या माणसाने श्रीनिवास खळे ह्यांच्याबरोबर खूप काम केलं आहे हे माहिती असल्याने  भीती नव्हती, तरी मनात धाकधुक होती. 'कट्यार….'चं संगीत मात्र मस्त जमलं आहे. गाणी ऐकायला सुरुवात केल्यावर तर धाकधुकही संपली होती आणि सिनेमा बघायची उत्सुकता वाढत चालली होती.  महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदा एक नाव संगीत दिग्दर्शनाच्या श्रेयनामावलीत झळकलं. सुवर्णाक्षरांनी लिहावं असं नाव -- पं. जितेंद्र अभिषेकी! 

न्यू जर्सीतला सिनेमाचा पहिला शो होण्याची तारीख आणि वेळ समजली तेव्हा मी ऑफीसमध्ये दुपारी जेवणाच्यावेळी डबा उघडत होतो. डबा खाऊन संपायच्या आधीच सिनेमाची तिकीटं संपली ही बातमी मिळाली! त्यानंतर पुढचे काही दिवस एक एक शो जाहीर होत होते आणि न्यू जर्सीकर जणू मटकेबाज झाले होते.  मटक्याचे आकडे ओपन व्हायची जशी वाट पाहिली जाते तसे सगळे 'मराठी विश्व'च्या फेसबुककडे नजर ठेवून होते. जो तो फेसबुकवर देव पाण्यात ठेवून बसला होता. थिएटर मालकाशी बोलून सिनेमाचे शो जाहीर करायचे, तिकीटांच्या वाढत्या मागणीला सामोरं जायचं ह्यात 'मराठी विश्व'तले आमचे मित्र अनिल खरे, दीपा लिमये गढून गेले होते. "थिएटरमध्ये एकदम २०-२५ तिकीटं घ्यायची कुणाला परमिशन देऊ  नका हो!" इथंपासून "माझ्या दीड वर्षांच्या जुळ्यांना आणले तर तुम्ही बेबी सीटींगची सोय कराल का?" अशा अचाट सूचना आणि प्रश्नांनी हैरान, परेशान होते! हा लेख लिहीपर्यंत न्यू जर्सीत वीस शोज झाले आणि जवळपास सगळे शोज 'सोल्ड आऊट'!  आता अमराठी मित्रही कट्यारच्या तिकीटांची चौकशी करू लागले आहेत. 'मराठी विश्व' उत्तमातील उत्तम कार्यक्रम / चित्रपट न्यू जर्सीत आणत राहील ह्याची पूर्ण खात्री आहे. त्यासाठी 'मराठी विश्व'च्या संपूर्ण कमिटीचे आभार!  'शोले' रिलीज झाला तेव्हा मी लहान होतो. 'शोले'च्या तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची उडालेली झुंबड फक्त ऐकली आहे तरी अनुभवली नाही. 'कट्यार….' आला तेव्हा काय माहोल झाला होता त्याबद्दल मात्र माझ्यासारखे अनेक जण भविष्यात आपल्या नातवंडांना सांगू शकतील. 

मिळाली रे मिळाली! एकदाची तिकीटं मिळाली!! 

कट्यार एक निर्जीव वस्तू पण ती निवेदक म्हणून कल्पकपणे चित्रपटात वापरली आहे. सिनेमाच्या सुरुवातीला सात सुरांचे कोरीव काम केलेली धारदार कट्यार रिमा लागू ह्यांच्या मुलायम आवाजात बोलू लागते. पहिल्या दृश्यापासून 'कट्यार…'ची मोहिनी मनावर पडायला लागते ती चित्रपट संपल्यावर वाढायला लागते. लहान मुलांना भारतीय शास्त्रीय संगीत ही काय चीज आहे ह्याचं आकर्षण वाटणं आणि ज्येष्ठ माणसांनी "क्या बात है!" म्हणणं हे मला तरी 'कट्यार…'चं खरं यश वाटतं! 

सिनेमा म्हणजे पटकथा अत्यंत महत्वाची असते. अर्धी बाजी इथेच मारली गेली आहे. बंदिस्त सभागृहातलं नाटक सिनेमात बदलताना 'सिनेमॅटिक लिबर्टी' ही एक दुधारी तलवार असते.  'सिनेमॅटिक लिबर्टी' ह्या नावाखाली जे काही चालतं त्याचा विचार केला तर 'कट्यार…'मध्ये स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते ह्याचे भान ठेवलं गेलंय. 

विक्रम गायकवाडांनी मेक-अपद्वारे प्रत्येकाला उठावदार केलं आहे. त्यातही ख़ाँसाहेब तर मस्त जमले आहेत. आतापर्यंत नितीन चंद्रकांत देसाई ह्यांनी आपल्याला जसं कला दिग्दर्शन दाखवलंय त्याप्रमाणे 'कट्यार'मध्ये कला दिग्दर्शक संतोष फुटाणे ह्यांनी राजमहालातील गाण्याच्या बैठकीपासून अनेक ठिकाणी आपले कौशल्य दाखवले आहे. तसंच  सिनेमा हे दृश्य-माध्यम असल्याने कॅमेरा आणि त्याच्या मागचा डोळा फारच महत्वाचा असतो. सुधीर पलसाने ह्यांनी ‘कट्यार…' सुखद केला आहे.  काजव्यांचा सीन तर खास म्हणजे खासच आहे! 

संगीतमय सिनेमा म्हणजे पार्श्वसंगीत आणि संगीत संयोजनाला विशेष महत्व!  ह्या बाबतीत संतोष मुळेकर आणि आदित्य ओकने फारच सुरेल काम केलंय. संगीत संयोजन म्हणजे चवदार जेवणात प्रत्येक पदार्थ नेमका हवा तेव्हा आणि हवा तेवढाच असतो तसं आहे. सुरेल वाद्यांमध्ये सतारीची, बासरीची एखादी कातिल सुरावट कानी येते, 'सूर से सजी संगीनी…'चा टाळ्यांचा ठेका, 'यशराज' स्टुडियोत विजय दयाळ ह्यांनी ध्वनितंत्रावर बारकाईने काम करत ग्रामोफोनवरच्या गाण्यात ऐकवलेली ती किंचीत खरखर सगळं असं आहे की सिनेमा थिएटरमध्येही आपण म्हणतो "व्वा!"  'कट्यार…'सारख्या सिनेमाच्या ध्वनीवर काम करताना काय काय करामती केल्या असतील त्याबद्दल 'डॉन' स्टुडियो (नरेंद्र भिडे, तुषार पंडित), पर्पल हेझ, यशराज ह्या आणि इतर काही स्टुडियोंच्या टीम्सशी गप्पा करायला रात्र कमी पडेल. 'कट्यार…'चं फक्त संगीत ह्या विषयावर लेख लिहिता येतील. तबला-डग्गा आणि पखावज ह्यांची साथ म्हणजे काय नैसर्गिक भारदस्तपणा असतो ते कृष्णा मुसळे, विनायक नेटके, प्रसाद जोशी वगैरे तालवाद्यांच्या माहीर साथीदारांनी ऐकवलंय. प्रत्येक वादकाचे, स्टुडियोचं, तंत्रज्ञाचं इथे नाव दयायला पाहिजे पण नमुन्यादाखल काही नावं लिहिलीयत. 

गीतकारांमधे समीर सामंत, मंगेश कांगणे, मंदार चोळकर, प्रकाश कापडिया ह्या सगळ्यांचे  काम अवघड होतं. ते अशासाठी की साक्षात पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहून ठेवलेल्या 'तेजोनिधी लोहगोल', 'सूरत पिया की', 'लागी करेजवा कटार', 'घेई छंद मकरंद' ह्या अजरामर गीतांच्या जोडीला उभी राहतील अशी गाणी लिहायची! 'मनमंदिरा', 'सूर से सजी', 'यार इलाही', 'दिल की तपीश' ही नवीन गाणी कट्यारच्या संचात अगदी फिट्ट बसलीयेत!   'सूर निरागस हो' तर 'सूरत पिया की'सारखं 'कट्यार'चं सिग्नेचर होईल. 'कट्यार'चा गाभा असणाऱ्या 'सूर निरागस हो' ह्या तीन शब्दांसाठी स्वानंद किरकिरेचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत!                          

'लागी करेजवा कटार' हे गाणं कधी येतंय ह्याची आपण आतुरतेने वाट बघत राहतो आणि ते गाणं चित्रपटात अगदी समर्पक ठिकाणी येतं. पं. जितेंद्र अभिषेकींच्या आवाजातलं गाणं सिनेमात वापरल्याने ती अभिषेकीबुवांना एक आदरांजली झाली आहे. त्याउलट 'या भवनातील गीत पुराणे' हे गाणं चित्रपटात येतच नाही.  आपण चुकचुकत असतो आणि मग लक्षात येतं की संपूर्ण सिनेमात ख़ाँसाहेब एकही मराठी शब्द बोलत नाहीत मग हे एकच मराठी गाणं का म्हणतील? त्याऐवजी 'सूर से सजी' हे नवीन दमदार गाणं आहे. 

गायकांच्या प्रांतात शंकर महादेवन, अरिजित सिंग, महेश काळे, आणि राहुल देशपांडे अक्षरश: 'सुटलेयत!’ शंकर महादेवनचे  'सूर निरागस हो….' तर नुसतं ऐकतानाही पंडितजींचे निष्कपट आणि सच्च्या सुरांचे प्रेमी ही प्रतिमा डोळ्यांसमोर उभं  करतं. महेशचं 'अरुणी किरणी….'  ऐकून, म्हणजे पुन्हा पुन्हा… पुन्हा पुन्हा ऐकूनही ऐकत रहावं असं वाटतं. अरिजित सिंगची आतापर्यंतची बरीच गाणी ऐकताना वाटायचं, “च्यायला! आपले किती प्रेमभंग झाले आहेत.” पण कधी उदास बिदास वाटलं तर सरळ 'शिव भोला ….' ऐकावं!  आणि राहुल देशपांडे -- 'सूर से सजी …', 'सूरत पिया की..', 'दिल की तपीश आज है आफताब…' आपण किती वेळा ऐकतोय ह्याची गणनाच नाही! भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात पं. भीमसेन जोशी आणि मन्ना डे ह्यांच्या आवाजातील ऑल टाईम क्लासिक 'केतकी गुलाब जुही'सारखीच राहुल आणि महेशची जुगलबंदी चिरंतन राहील. 

राहुलचे आजोबा ह्या सगळ्या गुणी गायकांना नक्की म्हणाले असते, "जीते रहो, गाते रहो!" 

चित्रपट, नाटक वगैरेबद्दल बोलताना अभिनयाचा उल्लेख कसा टाळता येईल? मृण्मयी देशपांडेनी  'उमा' जशी करेक्ट उभी केलीय तशीच अमृता खालाविलकरनी 'झरीना'! चित्रपटात दाखवल्यासारखीच आपट्याच्या अखंड पानातली दोन पाने. उमा आणि झरीना दोघींची मैत्री तसंच पंडितजींवर ओढवलेल्या प्रसंगामुळे होणारी तगमग दोघींनी नीट उभी केलीय.  साक्षी तन्वरने साकारलेली ख़ाँसाहेबांची बायको परिस्थितीच्या रेट्यामुळे आणि मुख्य म्हणजे ख़ाँसाहेबांसाठी जे काही करते ते करतानाचा चेहरा, डोळे कायमचे लक्षात राहतील. 

कविराजांच्या भूमिकेत पुष्कर श्रोत्री जेव्हा विद्या आणि कला ह्यातील फरक समजावून सांगतो तेव्हा त्याच्या आवाजाची लय छान आहे. तो सीन बघताना खूप वर्षांपूर्वी मी कोबोल प्रोग्रॅमिंग शिकत होतो त्याची आठवण आली. विद्या देता येते तर कला 'वरून' घेऊन यावी लागते -- हे म्हणजे साधारण असं आहे की सिंटॅक्स शिकवता येतो पण लॉजिक डोक्यात असायला लागतं! 

शंकर महादेवन अभिनय करणार हीच मुळात 'कट्यार…' जाहीर झाला तेव्हा बातमी होती. पंडितजी बघताना हे जाणवतं की एकदा हातात काम घेतलं  की शंकर महादेवन ते प्रामाणिकपणे पार पाडणार. गाण्यांच्या सीन्समध्ये तर ही इज ऑन होम पीच!
 
प्रांजळपणे कबूल करायचं तर ख़ाँसाहेबांचा रोल सचिन करणार ऐकल्यावर तर बऱ्याच भुवया आश्चर्यापेक्षा शंकेने
वर झाल्या होत्या! अशा प्रकारच्या रोलमध्ये सचिनला आपण कुणी पाहिले नव्हते त्यामुळे काम कसं  असेल त्याचा अंदाजही येत नव्हता. कलाकार जेव्हा त्याच्याबद्दल निर्माण झालेल्या शंकांना आपल्या कामामुळे खोटं ठरवतो तेव्हा त्या कलाकारासाठी अत्यंत आनंदाची बाब असते. सचिनला 'कट्यार'मुळे तो आनंद आणि समाधान नक्की मिळालं असेल. खरंतर कलाकारापेक्षाही रसिकांना आपण खोटे ठरल्याचा आनंद जास्त होतो. सचिनची चित्रपट कारकीर्द पन्नासहून अधिक वर्षांची आहे पण 'कट्यार' सचिनचा आतापर्यंतचा सर्वोत्तम रोल म्हणावा लागेल. चित्रपटाच्या कथेप्रमाणे / पटकथेप्रमाणे दिसणारे ख़ाँसाहेब त्याने मनापासून साकारले आहेत. काही ठिकाणी मात्र, विशेषत: शास्त्रीय संगीत गायकाचे हातवारे बघताना, "भाऊ… जरा कंट्रोल!" असं म्हणावंसं वाटतं. खैर ठीक है यार, बडे बडे पिक्चरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं! हा लेख वाचत असलेल्या बऱ्याच जणांच्या वयापेक्षाही सचिनची चित्रपट कारकीर्द मोठी असेल. इथे सचिनजींचा उल्लेख एकेरी संबोधून झालाय पण आपण  'शोले'च्या अहमदला बघतच तर लहानाचे मोठे झालोय. त्यामुळे उम्मीद है कि ये ठीक है!
 
'कट्यार'मधला सदाशिव असा आहे ज्याची पंडितजींचा गंडाबंध शागीर्द म्हणून गुरूवर अपार श्रद्धा आहे. मुख्य म्हणजे त्याला 'शिकण्याची' आस आहे. त्यापायी पाहिजे ती वणवण, वाटेल ते कष्ट करायला तो तयार आहे. सुबोध भावेने हे सदाशिवची तळमळ, तगमग व्यवस्थित साकारली आहे. सदाशिवचा, पंडितजींसाठी असलेल्या आदरामुळे परिणामांची पर्वा न करणारा, उतावळा स्वभाव दाखवणारा 'कव्वाली'चा भाग मस्त जमला आहे. 

लास्ट बट नॉट  लिस्ट -- चित्रपट हे पूर्णपणे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर सुबोध भावेनं दिग्दर्शक म्हणून पदार्पणातच त्रिशतक ठोकलंय. वैभव चिंचाळकरने दिग्दर्शनात सुबोधचा उजवा हात होऊन असंख्य गोष्टी सांभाळल्या आहेत. सिनेमा दिग्दर्शित करणं ही मुळात सोपी गोष्टं नाही. त्यातही 'चांगला' सिनेमा करणं तर सोपी गोष्ट नाहीच पण इतक्या संख्येने चित्रपट तयार होत असतात की हे काय फार अवघड नसावं असं आपल्याला वाटतं. चित्रपट चांगल्याप्रकारे दिग्दर्शित करण्यासाठी माध्यमाची जाण, प्रेक्षकांची आवड ह्या सगळ्यांपेक्षा दिग्दर्शकाची 'नजर' जास्त महत्वाची. सुबोध आता कुठला सिनेमा करेल ह्याची जगभरातले मराठी लोक उत्सुकतेने वाट बघतील. 

सिनेमा बघून झाल्यापासून मनात जाणवत होतं की काहीतरी दिसतंय पण सापडत नाहीये. काल ऑफिसहून परत येताना अचानक ते सापडलं. 'कट्यार' हा नुसता मराठी नाही, भारतीयही नाही, तर जागतिक चित्रपट म्हणायला हवा. तुमची, माझी, जगातल्या प्रत्येक माणसाची ही कहाणी आहे.  पंडितजी, सदाशिव आणि ख़ाँसाहेब ह्यातला प्रत्येकजण सिनेमातले पात्र नाही तर प्रतीक आहे. प्रत्येक माणसात एक पंडितजी, सदाशिव, आणि ख़ाँसाहेबही दडलेले असतात. असं म्हणतात की ब्रह्मापासून माया आणि मायेपासून सत्त्व, रज, आणि तम हे तीन गुण निर्माण झाले. पंडितजी म्हणजे सत्त्व, सदाशिव हा चांगले काहीतरी करण्याची आस असलेला रजो गुण तर ख़ाँसाहेब हे अहंकार म्हणजे तमो गुणाचे प्रतीक. 'मनुष्य हा तीनही गुणांनी बनलेला असतो' हे 'कटयार…' चित्रपटाच्या मायारूपातून निदान माझ्यापुरतं तरी जाणवलेलं आदि तत्त्व!

Saturday, August 9, 2014

लॉक ग्रिफिन -- एक भन्नाट कादंबरी!

नावावरून तर वाटतं की हा इंग्लिश कादंबरीचा अनुवाद असणार! त्याशिवाय मराठी कादंबरीचं नाव 'लॉक ग्रिफिन' असं अगम्य का असावं? 'वसंत वसंत लिमये' हे लेखकाचं नाव वाचल्यावर मात्र खात्री पटते की कादंबरी अनुवादित वगैरे नाहीये. आता ज्या लेखकाच्या नावातच वेगळेपणा आहे त्याच्या कादंबरीचं नावही जरा 'हटके' असणारच ना! जोक्स अपार्ट पण 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी जरूर वाचावी अशी आहे.  कादंबरीच्या शीर्षकातल्या 'लॉक' ह्या शब्दाचा स्कॉटलंडमधल्या पौराणिक 'गेलिक' भाषेतला अर्थ म्हणजे 'तलाव'. 'ग्रिफिन' हे  गरूडाचं डोकं आणि सिंहाचे शरीर असलेल्या एका पौराणिक प्राण्याचे नाव.  ग्रिफिनला सामर्थ्य, साहस, आणि शहाणपणाचं प्रतीक मानलं जातं. ही माहिती आणि ग्रिफिनबद्दल अजून थोडी माहितीही कादंबरी वाचायला सुरू करण्याआधी डाव्या पानावर वाचायला मिळते. 'लॉक' आणि 'ग्रिफिन' हे शब्द जरी पौराणिक असले तरी कादंबरीतल्या घटना इसवी सन २००० सालाच्या दहाएक वर्षं अलीकडे-पलीकडे घडणार्‍या आहेत. जसजसे आपण कादंवरी वाचत जाऊ तसतसे 'लॉक ग्रिफिन' ह्या दोन शब्दांचं कादंबरीतलं महत्व समजत जातं. 

नक्की का वाचावी ब्वॉ ही कादंबरी? मराठी साहित्यात इतक्या कथा - कादंबर्‍यांची भर पडत असते मग 'लॉक ग्रिफिन्'चे वेगळेपण कशात आहे?  एक तर ही एक रहस्यमय कादंबरी आहे. पण इंग्लिशमधे आपण 'मर्डर मिस्ट्री' म्हणतो तेवढाच कादंबरीचा आवाका नाहीये. तर हेरगिरी आणि त्या अनुषंगाने येणार्‍या अमेरिकेतील सी.आय्.ए, एन्.एस्.ए, किंवा भारतातील रॉ, एस.पी.जी अशा यंत्रणा ह्या जणू कादंबरीतील महत्वाची पात्रेच आहेत. कादंबरीची सुरूवात होते तेव्हा 'सौभद्र कानिटकर' हा कथानायक कॉलेजमधे शिकत असतो. मुंबईत राहणार्‍या त्याच्या वडिलांच्या बाबतीत आणि अमेरिकेत राहणार्‍या सख्ख्या धाकट्या काकाच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्याने सौभद्रची 'दुनिया इधर की उधर' होते. बरं तसं म्हटलं तर आजोबा, वडिलांचं मध्यमवर्गीय कुटुंब. अचानक उलथापालथ यावी असं काही आयुष्य नाही खरंतर! काका-काकूही अमेरिकेत राहूनही भारताशी असलेली नाळ जपून ठेवलेले. हं, काका मात्र आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर संगणक क्षेत्रात अशा स्थानी पोचलेला असतो की भारताचे एक तरूण पंतप्रधानही त्याच्या नजीकच्या संपर्कात असतात!

सौभद्रच्या वडिलांच्या आणि काका-काकूच्या बाबतीत अगदी थोडक्या दिवसांच्या अंतराने काही दुर्दैवी घटना घडतात. काका-काकू तर चक्क अमेरिकेतले पण त्यांच्या बाबतीत एक घटना घडते ती दिल्लीच्यापुढे उत्तरेला आणि आपले काका-काकू तिथे अचानक आले आहेत ह्याचा सौभद्रला पत्ताच नसतो. त्या घटनांनतर जवळपास आठ-नऊ वर्षांनी सुरू होतो 'लॉक ग्रिफिन'मधल्या तरूण सौभद्रने सुरू केलेला शोध. त्या घटनांबद्दल अशा सत्याचा शोध ज्याबद्दल त्याला काहीच माहिती नसते. टक्कर कुणाशी तर उद्योगजगातील एका बड्या समूहाशी, अंडरवर्ल्डच्या नामचीन गुंडाशी, आणि ऑक्टोपसप्रमाणे अनेक बाजूंनी हल्ला करू शकणार्‍या देशी – परदेशी सरकारी यंत्रणांशी! सत्य काय ते शोधायलाच पाहिजे ही सौभद्रची धडपड कशामुळे तर त्याला झोपेत अस्वस्थ करणार्‍या एका स्वप्नामुळे ज्यातला प्रदेशही सौभद्रला अनोळखी!...आणि त्याला ह्या शोधमोहिमेत साथ कुणाची तर अमेरिकेहून भारतात आलेल्या जुलिया नावाच्या गोर्‍या अमेरिकन तरूणीची जी सौभद्रची बाल- मैत्रिण असते!! बस्स... तिथून पुढे आहे तो सगळा 'लॉक ग्रिफिन'मधला खिळवून ठेवणारा प्रवास!

'लॉक ग्रिफिन्'मधल्या घटना घडतात त्या एका विस्तृत अशा आंतरराष्ट्रीय पटलावर! नाशिक, मुंबई, सातारा, कोकण अशा महाराष्ट्रातल्या जागांपासून ते पार वर उत्तर भारतातल्या हर्सिल, उत्तर काशी, दिल्ली अशा तर भारतातल्याच जागा. त्याशिवाय अमेरिकेतील पूर्व किनार्‍यावरची वर्जिनिया, मेरिलँडपासून ते वर नायगारा फॉल्स आणि पश्चिमेला कॅलिफोर्निया! इंग्लंड, स्कॉटलंड असे युरोपमधील देश तर सांगायलाच पाहिजेत. ह्या बाबतीत प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे सह्याद्री आणि परदेशातील गिर्यारोहणामुळे लेखकाला लाभलेला प्रचंड अनुभव. शिवाय लेखकाने ह्या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन - राहून सग़ळा परिसर अनुभवी नजरेने पाहिल्यामुळे सगळी ठिकाणं नजरेसमोर येतात. ज्या ठिकाणी आपण अनेकदा जाऊन आलोय त्या ठिकाणांबद्दलही नव्याने माहिती मिळते. ह्या सगळ्यात कादांबरीचं कथासूत्र सौभद्रबरोबर पुढे सरकतच राहतं आणि ते ही वेगानं. सौभद्रच्या काका-काकू आणि वडिलांच्या बाबतीत 'नक्की काय झालं असेल?' ही उत्सुकता आपल्याला बांधून ठेवते.  मला तरी 'लॉक ग्रिफिन' वाचताना वाटत होतं की आपण जणू विस्तृत पटलावर घडणारी 'दा विन्चि कोड'सारखी एखादी इंग्लिश कादंबरीच वाचतोय.

कादंबरीत मधेच एखादं वाक्य असं येतं की आपण वाचता-वाचता थोडं थांबून स्वत:शीच म्हणतो की अरे! ह्या वाक्यात तर जणू आपल्याच मनातल्या भावना लिहिल्या आहेत. एक उदाहरण द्यायचं तर एका ठिकाणी साधारण असा उल्लेख आहे -- <<'इंडिया' हा शब्द म्हणजे त्याच्यासाठी लहानपणी वादळी रात्री, वीजांच्या कडकडात आईच्या कुशीत मिळणार्‍या सुरक्षिततेसारखा होता.>> जगभर पसरलेल्या अनेक परदेशस्थ भारतीयांच्या मनात कधी ना कधी उमटणारी ही भावना आहे! पंकज उधासच्या 'चिठ्ठी आयी है....वतन की मिट्टी आयी है' अशासारखीच ही भावना! कितीही वर्षं कर्मभूमीत राहिलो तरी मायभूमीतल्या आपल्या मुळाकडे मनाला ओढणारी भावना!!

भारतीयांची जी पिढी आता साधारण चाळिशीच्या पुढच्या आहे त्यांना ठळकपणे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे 'लॉक ग्रिफिन'मधल्या दोन महत्वाच्या पात्रांचे चित्रण हे भारताच्या दोन माजी पंतप्रधानांवर बेतलेले आहे. त्यांच्या वृत्तीबद्दल, कामाच्या आवाक्याबद्दल, माणसे जोडण्याबद्दल, आणि देशासाठी चांगले काही करण्याच्या तळमळीबद्दल वाचताना आपल्या लहानपणी / तरूणपणी ऐकलेली / पाहिलेली त्यांची भाषणे वगैरे मनाच्या एका कोपर्‍यात आठवत राहतात. भारत, अमेरिका अशा देशांचे एकमेकांशी असलेले राजनैतिक संबंध आणि अत्यंत उच्च पातळीवर सरकारी कारभारातली धावपळ / गुप्तता / हेवेदावे ह्याचा अंदाज येऊ लागतो.  सॉफ्टवेअर क्षेत्रातली क्रिप्टॉलॉजी / एनक्रिप्शन म्हणजे साठवलेली माहिती गुप्त राखण्यासाठीचे क्षेत्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातली थोडी माहिती वगैरे 'लॉक ग्रिफिन'मधे येते पण ती कंटाळवाणी होत नाही. उलट त्यामुळे वाचकाची उत्सुकता वाढत जाते.

कादंबरीची उणी बाजू दाखवायची म्हटलं तर मात्र आपल्याही नकळत तपशीलवार वर्णनाकडे बोट जातं. काही पानांवरचं एखाद्या ठिकाणाचं किंवा एखाद्या पात्राच्या आयुष्यातल्या भूतकाळाचं तपशीलवार लेखन अनावश्यक आणि कंटाळवाणं वाटू शकतं. अधून्-मधून येणारी तेवढी पानं चिकाटीने वाचली तर एकंदर 'लॉक ग्रिफिन' वाचत रहावीशी वाटते. कादंबरीची दुसरी आवृत्ती लवकरच दुकानांत यावी असं मला मनापासून वाटतंय. त्या आवृत्तीत जर अनावश्यक तपशीलाची काटछाट करता आली तर मात्र 'लॉक ग्रिफिन' एक जबरदस्त वेगवान अशी रहस्यमय कादंबरी होईल. मग ती एक अशी कादंबरी होईल जी एकदा हातात घेतली की रात्रभर जागून का होईना पण वाचकाला ती पूर्ण वाचल्याशिवाय चैनच पडणार नाही!

साधारणपणे एखाद्या कादंबरीवर चित्रपट निघाला की कादंबरी आवडलेला माणूस त्या चित्रपटाच्या घोषणेपासूनच चित्रपटाच्या क्वॉलिटीबद्दल साशंक असतो. 'लॉक ग्रिफिन'वर एखादा तितकाच अप्रतिम चित्रपट निघावा हे मात्र मनापासून वाटतंय. दिग्दर्शन, अभिनय,संगीत आणि पार्श्वसंगीत, छायाचित्रण, वेषभूषा अशा अनेक बाजूंनी खूप काही भरभरून करण्यासाठी 'लॉक ग्रिफिन' योग्य आहे. अर्थात चित्रपट तयार करताना ह्या रत्नाला एखादी सामान्य काच म्हणून पेश करण्याची दुर्बुद्धी निर्माता - दिग्दर्शकाला होऊ नये म्हणजे मिळवलं!  गरज आहे ती एखाद्या जवाहिर्‍याने ह्या रत्नाला योग्य पैलू पाडून जगभर नेण्याची. तयार होणारा जर मराठी असला तर मग सोन्याहून पिवळं!

Thursday, March 13, 2014

बासरीचा सूर

बासरीला सूर यावा लागतो
फुंक नाही श्वास द्यावा लागतो … 1


कैक दिव्ये पार पाडो देवकी
पण युगंधर वाचवावा लागतो …. 2


गायकाचा रंगण्याला मारवा
रिषभ कोमल आत व्हावा लागतो …. 3


झाड होण्या बीजही सैलावते
ऊन, पाणी, वेळ खावा लागतो …. 4


ऐनवेळी ते विकाया लागते
भाव स्वप्नाचा मिळावा लागतो …. 5


पंख नुसते काय कामाचे, खगा?
ध्यास गगनाचा असावा लागतो …. 6


कर्मकांडे लाख केली, विठ्ठला!
मुक्त होण्या जीव जावा लागतो …. 7

 

 
 





 

 

Sunday, November 10, 2013

झोपेचं खोबरं!


"काय मग! झोप लागली का नीट?"कुणालाही हा प्रश्न विचारून बघा. बहुतेक लोकांकडून उत्तर मिळेल, " छ्या! का माहिती नाही पण अधून-मधून सारखी जाग येत होती."  पण त्याच माणसाच्या कुटुंबातील इतर लोक, विशेषत: 'बेटर हाफ', म्हणतील, "काय झोप लागली नाही म्हणतोय! रात्रभर चांगला घोरत होता. ह्याच्या घोरण्याने उलट माझीच झोप नीट झाली नाही!!"
तर मग ही झोपेची नक्की काय भानगड आहे? शिवाय त्यात घोरण्याचे महत्व काय? खरं तर '' घोरण्याचे महत्व काय? स्वानुभवातून आलेलं शहाणपण जमेल तितक्या लोकांबरोबर वाटावं हे ह्या लेखाचं प्रयोजन.  लेख वाचल्यावर शांत झोपेचं महत्व पटून जर स्वत:च्या झोपेविषयी कुणाचे डोळे उघडलेआणि त्यांनी शांत झोपेसाठी प्रयत्न सुरू केले तर तेच ह्या लेखाचं फलित!
अत्यंत महत्वाचा डिस्क्लेमर -- मी वैद्यकशास्त्राचा जाणकार नाही!  ह्या लेखाचा उपयोग फक्त सामान्य ज्ञानापुरता ठेवावा. आपल्या झोपेविषयी कृपया स्वत:च्या डॉक्टराशी चर्चा करावी!  'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे झोपेच्या बाबतीतही  खरं आहे.  बाकी मग झोप, स्लीप अ‍ॅप्निआ, सी-पॅप मशिन / मास्क ह्या विषयांबद्दल जनरल बोलायला, प्रोत्साहनासाठी एक मित्र म्हणून आपुन का दरवाजा, फोन, इमेल हमेशा खुला है!

अगदी दीडेक वर्षांपूर्वीपर्यंत मी झोपलो की एखाद्या प्रोफेशनल स्विमरसारखा श्वास घ्यायचो! थोडक्यात म्हणजे स्विमर जसा ठराविक वेळाने श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर डोकं काढतो तसा मी जवळपास दर मिनिटाआड जागा व्हायचो पण मला ते कळायचंच नाही. फक्त इतकंच समजायचं की रात्री आपली झोप नीट  झाली नाहीये, सकाळी उठवत नाहीये, दिवसभर आळसावल्यासारखं वाटतंय, आणि दुपारी साधारण तीनच्या सुमारास कॉफी किंवा चहा नाही घेतला तर राहिलेला दिवस कठीण आहे.  एखाद्या गोष्टीत मन एकाग्र होण्याचे बारा वाजले होते आणि ऐन संध्याकाळी सहा - साडेसहा वाजताही कार चालवताना झोप यायची.  बायको - मुलानेच काय पण मित्रमंडळीनेही माझ्या घोरण्याचा धसका घेतला होता. छोट्या-छोट्या कारणांनीही चिडचीड व्हायची आणि ब्लड प्रेशर कायम वरच्या बाजूला उडी मारायचं! हे सगळं का व्हायचं ते कळण्यासाठी आधी आपण झोपतो तेव्हा नक्की काय होतं ते जरा समजून घेऊ.

झोपेमुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते तर शरीराला छान विश्रांती मिळते आणि दिवसभरात शरीराची झालेली मोडतोड भरून निघते. त्यामुळे दुसऱ्या दिवसासाठी ऊर्जा मिळते. सकाळी उठल्यावर ताजंतवानं वगैरे म्हणतात ते वाटतं.  लहान मुलांना जवळपास ९-१० तास झोपेची गरज असते तर तरूण / प्रौढ लोकांना साधारण ७-८ तासाची शांत झोप आवश्यक असते. ती जर झोप नीट झाली नाही तर दुसऱ्या दिवशी चिडचीड होणार हे ठरलेलं! आपण झोपतो तेव्हा आपल्या झोपेच्या काही स्लीप सायकल्स होतात.  एक स्लीप सायकल साधारण २-३ तास असते म्हणजे रात्री आपण जर ७-८ तास झोपतो असे मानले तर त्यामध्ये आपल्या साधारण ३ स्लीप सायकल्स होतात. ह्या स्लीप सायकलमध्ये झोपेचे काही टप्पे असतात.  ते टप्पे पाहिले की आपल्याला झोपेचा जरा अंदाज येईल.

पहिल्या टप्प्यात डोळे पेंगुळायला वगैरे लागतात. हलकी हलकी झपकी यायला लागते. दरवाज्यावर कुणी टकटक केले तरी जाग येते.  बायको आपल्याला उत्साहाने काहीतरी सांगत असते आणि आपण नुसतं 'हंहं' करत असतो. "आता झोपतो, आपण उदया बोलू!" हे वाक्य आपण मनातल्या मनात म्हणत असतो. हीच ती बेसावध वेळ असते जेव्हा मधेच कधी तरी आपला आवाज बंद होतो आणि दुसऱ्या दिवशी बायकोचा सुरू होतो!

दुसऱ्या टप्प्यात शरीराचे स्नायू छान सैल पडायला लागतात. हात-पाय वगैरे हलवायची शक्यता कमी होत जाते. 'मेंदू' नावाची आपल्या शरीरातील भन्नाट चीज जागी राहते आणि आपल्याला विश्रांती देऊ लागते.  निद्रा राणी आपल्याला कुशीत वगैरे घ्यायला लागते. हलक्याशा स्वप्नांत सुंदर चेहऱ्यांची झलक मिळायला लागते.

तिसऱ्या टप्प्यात आपण गाढ झोपेत जायला लागतो. गाढ म्हणजे एकदम गाढ झोप! काही जण आपल्याला "घोडे बेच के सो गया" म्हणतात पण आपण लक्ष द्यायला जागेच नसतो. ह्या झोपेतून माणसाला जागं करणं अवघड जातं. कुंभकर्ण त्याच्या झोपेचा बराच वेळ ह्या टप्प्यात घालवत असावा! ह्या झोपेतून माणूस एकदम दचकून जागा होतो. "मैं हॉं हूं?"  प्रश्न विचारणारा माणूस ह्याच झोपेतून जागा झालेला असतो.  ह्या टप्प्यात स्नायू आणि हाडांची डागडुजी सुरू असते. त्यामुळेच म्हणतात की शरीरातील अतिरिक्त चरबी हटवायची असेल, म्हणजे fat burning, तर दिवसातल्या व्यायामप्रकारांत स्नायू कणखर करणारे (strength training) व्यायामही करावेत. ह्या टप्प्यात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवायचं कामदेखील चालू असतं. 

त्यानंतरचा झोपेचा टप्पा म्हणजे 'रेम' -- REM (Rapid Eye Movement) sleep.  ही झोप फारच महत्वाची असते. ह्यात नक्की काय होतं महाराजा? तर दोन गोष्टी होतात.  एक म्हणजे भन्नाट स्वप्नं पडतात. भन्नाट म्हणजे भ-न्ना-ट! आपण झोपेतच डोळे गरागरा फिरवत असतो जणू काही झपाझप हलणाऱ्या चित्रांना डोळ्यांत साठवायला बघतोय. म्हणून तर नाव आहे Rapid Eye Movement! उदाहरणच दयायचं तर ….आपण 'स्पायडर मॅन' आहोत आणि 'जेन'ला वाचवायला न्यू यॉर्कच्या जंगलात इमारतींवरून उड्या मारतोय! भन्नाट स्वप्नं आहे म्हणजे 'जेन' काय 'टारझन'बरोबरच असायला पाहिजे का? बरं, आता लक्षात आलं का मेंदू शरीराला का सैलावून ठेवतो ते? नाहीतर तुम्ही काय हो, खरंच पलंगावरून उड्या मारायला जायचात!  दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ही होते की मेंदूतल्या स्मरणशक्तीच्या कप्प्याची साफसफाई सुरू होते. दिवसभरात आपण अनेक गोष्टी डोक्यात साठवतो. त्यातल्या अनावश्यक गोष्टींवर 'डिलिट' बटण दाबले जातं!  जर REM नीट झाली नाही तर स्मरणशक्तीच्या कप्प्यात सावळा गोंधळ व्हायला लागतो.  अर्थात हे काही एक-दोन रात्रीत होत नाही पण काही वर्षांनंतर स्मरणशक्तीच्या तक्रारी सुरू होतात. 'अल्झायमर'सारख्या गंभीर रोगाच्या दिशेने पावले पडण्याची सुरुवात होऊ शकते!

मगाशी लिहिल्या प्रमाणे स्लीप सायकल्स असतात आणि पहिल्या सायकलमधली  REM झोपल्यापासून साधारण दीड तासानंतर सुरू होते. पण ती जेमतेम दहा मिनिटांची असते. गंमत म्हणजे दोन-तीन स्लीप सायकल्समध्ये दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील झोप रिपीट होत असते आणि पहाटे रात्री चारच्या सुमाराची REM साधारण चांगली तासभर टिकते.  रात्रीच्या अंधारात चोऱ्या करणाऱ्यांनाही हे गणित माहिती असतं का ते नक्की ठाऊक नाही पण बघा बहुतेकशा चोऱ्या पहाटे तीन - चारच्या सुमारास होतात. त्यावेळेला आपल्यासारखे बरेचजण 'घोडे बेच के सो गये' असतात किंवा मग 'स्पायडर मॅनसारख्या भन्नाट स्वप्नांत हरवलेले असतात!  

आता बघूया ह्या सगळ्यामध्ये 'घोरणं' ही भानगड कुठे येते? आपण झोपलो तरी श्वसनमार्गातून श्वासोछ्वास चालू असतो. म्हणजे काय? असणारच ना! तर, आठवतंय ना -- झोपेत शरीरातील सगळे स्नायू सैलावलेले असतात? श्वास घ्यायच्या मार्गातील वरच्या बाजूचे स्नायूही असेच सैलावल्याने श्वासाचा मार्ग अरुंद होतो. त्यामुळे श्वास आत घेताना अडथळा होऊन झेंडा फडफडल्यासारखा  आवाज होतो.  हा आवाज म्हणजेच घोरणं!  ह्यात होतं काय की जर हा अडथळा  खूप वाढला तर घोरण्याचा आवाजही खूप वाढतो. अशा वेळेस माणसाला स्लीप अ‍ॅप्निआ असण्याची शक्यता असते. विशेषत: स्थूलपणा, उच्च रक्तदाब वगैरे असेल तर डॉक्टरशी बोलणं चांगलं! 

ह्या सगळ्या भानगडीत एक गोष्ट लक्षात आली असेल की श्वासोच्छ्वास नीट  झाला नसल्याने आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. मेंदूला सिग्नल जायला लागतात की बाबा हौ तुझं काय खरं नाही आतामरतोय बघ! मेंदू सावध असतोच त्यामुळे तो माणसाला जिवंत ठेवायची धडपड सुरू करतो आणि तेही अगदी पद्धतीत!  तुम्ही श्वास घायचा खात्रीशीर मार्ग म्हणजे तुम्ही जागं होणं आणि मेंदू तेच करायला सुरुवात करतो! पैलेछूट काय होतं तर आपली चुळबूळ  सुरू होते. कुशी बदलणं वगैरे प्रकार सुरू होतात. 'करवटें बदलते रहें, सारी रात हम' हे काय फक्त प्रेयसीच्या आठवणीनेच होतं असं काय नाय!  तरी जाग आली नाही तर मग तहान लागते! आता काय, पाणी प्यायला तरी उठशील की नाही? तरीसुद्धा जाग आली नाही तर मग मेंदू अजून जोरात प्रयत्न करतो आणि चक्क बाथरूमला जावंसं वाटायला लागतं. जणू मेंदू म्हणतो, "उठ लेका उठ, मरशील नाहीतर!"  पाणी प्यायला किंवा बाथरूमसाठी उठल्यावर आपोआप  थोडा नीट श्वास घेतला जातो.  पण काहीवेळा असंही होऊ शकतो की हे सगळे प्रयत्न वाया जातात. मग मात्र मेंदू त्याच्या भात्यातले ब्रम्हास्त्र काढतो! आपल्या मनाच्या तळाशी दडून बसलेली भीती डोकं वर काढते. मग कुणाला असं वाटतं की आपण खूप उंचावरून अचानक खोल खड्यात पडलोय तर कुणाला वाटतं आपल्यामागे साप लागलाय!  त्यामुळे आपण दचकून जागे होतो. ह्या सगळ्याचं साध्य एकच असतंआपल्याला श्वास घ्यायला भाग पाडणं!! 

स्लीप अ‍ॅप्निआतल्या ‘‍अ‍ॅप्निआशब्दाचा  अर्थ आहे झोपेत किंचितसा वेळ श्वास थांबणं! प्रत्येक माणसाला कसं ब्लड प्रेशर असतंच फक्त ते प्रमाणाबाहेर जात राहिलं की आपण म्हणतो की अमक्या-तमक्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. तसंच प्रत्येकाला हा अ‍ॅप्निआ असतो पण श्वास थांबण्याचं प्रमाण वाढायला लागलं किंवा श्वास थांबण्याचा वेळ वाढायला लागला असं दिसलं की डॉक्टर म्हणतो -- तुला स्लीप अ‍ॅप्निआ आहे रे बाबा! दुर्दैवाने एकंदर भारतीय समाजात ह्या प्रकाराबद्दल फारशी जागरूकता नाही.  उलट आपण म्हणायला मोकळे की च्यायला ही नसती अमेरिकन थेरं आहेत! म्हणे घोरणं एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं!!  

आता जर कुणाला स्लीप अ‍ॅप्निआ आहे का ते कळणार कसं? उत्तर सोपं आहे स्लीप स्टडी! स्लीप स्टडी सेंटरमध्ये एका रात्रीसाठी आपल्याला जावं लागतं किंवा एक यंत्रं एका रात्रीसाठी डॉक्टर आपल्याला घरी वापरायला देतात.  रात्रभरात त्या यंत्रात जमा झालेल्या माहितीतून हे पाहिलं जातं की एखादयाला स्लीप अ‍ॅप्निआ आहे का? असल्यास किती प्रमाणात आहे आणि उपाययोजनेसाठी सी-पॅप मशीनचा उपयोग करताना हवेच्या झोताचे प्रमाण किती ठेवायला हवे.  

मग आता स्लीप अ‍ॅप्निआवर उपाय काय? वजन कमी करणं, विशेषत: गळ्याभोवतीची अतिरिक्त चरबी कमी करणं उत्तम. त्यासाठी मग ते नियमित व्यायाम करणं, हिरव्या भाज्या खाणं वगैरे सगळं आलंच! शिवाय एका विशिष्ठ प्रकाराच्या प्राणायामाने फायदा होतो असं ऐकलं आहे पण स्वानुभव नाही.  मी घेत असलेला उपचार इथे सांगतोय आणि ह्याचा नक्की फायदा होत असलेला अनुभवतोय!  तर  सी-पॅप मशीन वापरायचं. CPAP म्हणजे continuous positive airway pressure.  'गुगल'बाबाला CPAP असं विचारलं तर बरीच माहिती मिळेल. ह्यामध्ये आपल्या नाकावर लावायला एक मास्क असतो आणि मास्कचं दुसरं टोक एका नळीने मशीनला जोडलेलं असतं.  मशीनमधून ठराविक प्रमाणात हवेचा झोत नाकातून सतत सोडला जातो. त्यामुळे श्वसनमार्ग व्यवस्थित उघडा राहतो आणि झोपेतही ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत राहतो.  मास्कने तोंड बंद असतं त्यामुळे तोंडाने श्वास घेतलाच जात नाही आणि घोरणंही बंद होतं! है शाब्बास आपलं घोरणं बंद झाल्याने आसपासचे लोकही सुखाने झोपू शकतात! व्यवस्थित ऑक्सिजन मिळाल्याने झोपमोड व्हायचा प्रश्नच येत नाही आणि मेंदू आपली सगळी अस्त्रं भात्यात ठेवून देतो. सकाळी उठल्यावर ताजंतवानं वगैरे काय म्हणतात ते वाटतं. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रित व्हायला मदत होते.  मी साधारण गेले दीड वर्षं  सी-पॅप मशीन वापरतोय आणि नक्की फायदा झालेला अनुभातोय. बरं हे मशीन प्रवासात वापरायलाही सुटसुटीत असतं त्यामुळे अगदी एका रात्रीसाठीही कुठे जाताना मशीन सहज बरोबर नेता येतं. फक्त झोपण्याच्या जागेजवळ इलेक्ट्रिसिटीचा पॉईंट असायला हवा. सुट्टीसाठी भारतात आलो होतो तेव्हा मला पुणे, गोवा अशा ठिकाणी घरी, हॉटेलमध्ये सगळीकडे मशीन व्यवस्थित वापरता आलं.  

अर्थात कुठलीही नवीन गोष्ट वापरायला शिकताना सुरुवातीला जरा त्रास होतो तसाच हे मशीन वापरतानाही होऊ शकतो. पण नेटाने प्रयत्न चालू ठेवले आणि मशीनची  सवय झाली की मग झोपेसारखं सुख नाही!  मगाशी म्हणालो तसं काही मदत / प्रोत्साहन हवं असल्यास आपुनका दरवाजा, फोन, इमेल हमेशा खुला है! खोटं नाही सांगत पण आता रात्र जवळ आली की मनापासून आनंद होतो की चला आता छानपैकी झोपायचं! मग दुसऱ्या दिवशी सकाळी गजर व्हायच्या आधीच जाग येताना मनात 'भटियार'चे प्रसन्न सूर गुंजायला लागतात -- 'पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा…. जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा!'
------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी -- मायबोली दिवाळी अंक २०१३
------------------------------------------------